मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. दाखल झालेले गंभीर गुन्हे वगळता अन्य गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येत आहे. ही प्रक्रिया जलदगतीने राबविण्यात येईल, असे आश्वासन गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे.
राज्यात मराठा आरक्षण लागू करावे या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. यावेळी काही ठिकाणी उद्रेक पाहायला मिळाला. पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर गुन्हे दाखल केले होते. यासंदर्भात मराठा समाजाच्या शिष्टमंडळासोबत गृहराज्यमंत्री केसरकर यांची एक बैठक झाली. यावेळी गृह विभागाचे प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता, मराठा समाज शिष्टमंडळातील प्रतिनिधी राजेंद्र निकम, दिलीप पाटील, बाबा गुंजाळ, रुपेश मांजरेकर, संजय पाटील, विवेक सावंत, स्नेहा गावकर आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर केसरकर यांनी हे आश्वासन दिले.