खामगाव(प्रतिनिधी) – शेगाव तालुक्यातील भास्तन येथील पुर्णा नदी पात्रातून शहरात अवैध रेती मोठ्याप्रमाणावर येत आहे. मात्र याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून त्यामुळे शासनाला महसुलापोटी लाखोचा चुना लागत असल्याचा आरोप होत आहे. कोरोना महामारीमुळे शनिवारी व रविवारी संचारबंदीच्या काळात तर जलंब रस्त्यावर रेती वाहनांची वर्दळ दिसून येते. इतर दिवशीही राजरोसपणे रेती तस्करी सुरू असल्याचे बोलले जात आहे.
भास्तन येथील पूर्णा नदी पात्रातून खामगाव व शेगाव शहरात रेती वाहतूक केली जाते. रेती तस्करीला आळा घालण्यासाठी महसूल विभागाने पथके नियुक्त केली असेल तर रेती तस्करी कशी सुरू आहे. एका रॉयल्टीवर एका वाहनाव्दारे कित्येक ट्रिपा मारल्या जात आहेत, सध्या रेतीचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे रेती माफिया व संबंधित अधिकारी आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. मागील वर्षी रेती तस्करीची गाडी अडविण्याचा प्रयत्न करणार्या जलंब पोस्टेच्या कर्मचार्याला वाहनाखाली चिरडण्यात आल्याची घटना घडली आहे. तरीसुध्दा याकडे महसूल प्रशासन लक्ष देण्यास तयार नसल्याचा आरोप होत आहे. पुर्णानदी पात्रातुन रेती उत्खनन करून शहरात आणल्या जात आहे. दररोज सुमारे 50 -60 वाहने रात्रंदिवस रेतीच्या कित्येक ट्रिपा मारत आहेत.
एका रॉयल्टीवर अनेक ट्रीपा मारून शासन महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले जात आहे. मध्यंतरीच्या काळात कारवाईचा धडाका लावण्यात आला होता. आता मात्र सर्व काही सीट राईट झाल्याने कारवाया थंडबस्त्यात पडल्याचे बोलले जात आहे. रेतीची वाहने माटरगाव-जलंब-पहुरजिरा मार्गे पारखेड फाटा-एमआयडीसी मार्गे शहरात तसेच वाडी मार्गे तायडे कॉलनी अशी जातात. मात्र त्यांना पकडण्यात यश येत नाही. शहरातील बांधकाम स्थळी व माफियांनी साठविलेले रेतीचे ढिगारे तपासल्यानंतर अवैध रेती तस्करीची कल्पना संबंधितांना येईल. तुर्त एवढेच.