नवी दिल्ली : देशात दिवसेंदिवस कोरोनाव्हायरसच्या रुग्णांचा आकडा वाढतो आहे. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आतापर्यंत 396 पर्यंत पोहोचला आहे. तर या व्हायरसमुळे भारतात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत भारतात कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातमधील सुरत येथे एका 67 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. याआधी बिहार आणि महाराष्ट्रात प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्रात ८९ रुग्ण आहेत. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी देशातील अनेक राज्यांत लॉक डाऊन करण्यात आले आहे. कोरोनाची महाराष्ट्रातील वाढती संख्या चिंतेची बाब असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण महाराष्ट्र लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 31 मार्चपर्यंत संपूर्ण राज्याात बंद पाळण्याचं आवाहन प्रशासनाकडून जनतेला करण्यात आलं आहे.
रविवारी जनता कर्फ्यू पाळण्यात आला होता. त्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानं कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव टाऴण्यासाठी सरकारनं लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालये, पेट्रोलपंप, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी काही ठराविक दुकानं सुरु राहणार आहेत. लोकलसह रेल्वे आणि बस सेवाही 31 मार्चपर्यंत बंद करण्यात आल्या आहेत.