पटना : बिहारमध्ये अनेक जिल्ह्यामध्ये वादळाने दाणादाण उडवली असून राज्यात विविध ठिकाणी विजा कोसळून ८३ जण ठार झाले आहेत. गोपालगंज जिल्ह्यात सर्वाधिक १३ वीजबळी गेले असून, मुख्यमंत्री नितीनकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.
बिहारमध्ये गुरूवारी वादळामुळे प्रचंड जीवितहानी झाली आहे. वादळादरम्यान राज्यात ठिकठिकाणी विजा कोसळून तब्बल ८३ नागरिक मरण पावले आहेत. यात सर्वाधिक वीजबळी गोपालगंज जिल्ह्यात गेले आहेत. गोपालगंजमध्ये वीज कोसळून १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे मधुबनी व नबादा जिल्ह्यात प्रत्येकी ८ लोक मरण पावले आहेत.
बिहारमधील आठ जिल्ह्यामध्ये ५ वीजबळी गेले आहेत. यात गोपालगंज, पूर्वी, चंपारण, सिवान, बांका, दरभंगा, भागलपूर, मधुबनी व नबादा यांचा समावेश आहे. मृतांच्या आकडा समोर आल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. वीज कोसळून मरण पावलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा नितीशकुमार यांनी केली आहे.
दुसरीकडे उत्तर प्रदेशातही वीजबळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशात ९ लोक मरण पावले आहेत. देवरिया जिल्ह्यात ७ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला, तर बाराबंकी जिल्ह्यात २ जण ठार झाले, तर २ जण होरपळे आहेत.