नागपूर : बलात्कारासारख्या घटना थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवायला हवेत,असं विधान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं आहे.नागपूर विद्यापीठातील जमनालाल बजाज अॅडमनिस्ट्रेटिव्ह भवनाच्या उद्घाटनासाठी राज्यपाल नागपूरमध्ये आले होते. यावेळी त्यांनी महिलांवरील होणारे अत्याचार कसे थांबवण्यात येतील, यावर आपलं मत व्यक्त केली.
देशात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. ती रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना संस्कृतचे श्लोक शिकवले गेले पाहिजेत. ज्यावेळी घराघरांमध्ये कन्यापूजन केलं जात होतं. परंतु सध्या देशात काय घडत आहे? काही लोकांकडू बलात्कार, अत्याचार अशा घटना घडत आहेत. आपल्या ताकदीचा वापर अत्याचारासाठी करावा की सुरक्षेसाठी करावा, असा सवालही त्यांनी केला. विद्यार्थ्यांना संस्कृत श्लोक शिकवा म्हणजे असे प्रकार रोखले जातील, असंही ते म्हणाले.
यावेळी कोश्यारी चांगल्या आणि वाईट लोकांमधील फरक, ज्ञानाचा वापर-गैरवापर, सत्ता आणि पैसा अशा विषयांवर मार्गदर्शनही केले. यापूर्वी खासदार गणेश सिंग यांनीदेखील संस्कृतबाबत वक्तव्य केले होते. अमेरिकेतील एका शैक्षणिक संस्थेच्या संशोधनानुसार नियमितपणे संस्कृत बोलल्यास मज्जासंस्थेस चालना मिळते. तसेच यामुळे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलही दूर राहतो असा दावा सिंग यांनी केला होता.