पाचोरा –
पाचोरा तालुक्यात गेल्या आठ दिवसांपासून सुमारे ७० ते ८० टक्के शेतकऱ्यांनी कापूस व मक्याची धुरळ पेरणी केली होती. मात्र दिनांक २३ रोजी तीन ते चार तास झालेल्या रिपरीप पावसामुळे पिकांची चांगल्याप्रकारे उगवणशक्ती होणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे, पाचोरा तालुक्यात दिनांक २३ रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दोन तास रीपरीप पाऊस झाल्यानंतर पुन्हा एका तासाच्या विश्रांती नंतर दोन तास पाऊस बरसला. या पूर्वी दिनांक २० रोजी तासभर पाऊस झाला होता. बहुतांशी शेतकऱ्यांनी पेरणी केल्याने व समाधान कारक पावसास सुरवात झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. पाचोरा शहरात आठ ते दहा दिवसाआड पिण्यासाठी पाणी मिळत आहे मात्र ग्रामिण भागात २४ टॅकर व्दारे २६ गावात पाणी पुरवठा केला जात आहे. अनेक गावात महीना महिना पिण्यासाठी पाणी येत नसल्याने नागरीक मिळेल त्या ठिकाणाहून व मिळेल त्या साधनाने पाणी आणून आपली तहान भागवत आहेत. पिण्याच्या पाण्याचे संकट दूर होण्यासाठी किमान दोन ते तीन जोरदार पावसाची आवश्यकता आहे. आजही ढगाळ वातावरण निर्माण झाले असून पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.