निपाणे, ता.एरंडोल (वार्ताहर) : सध्या लॉकडाऊनच्या पाश्र्वभूमीवर निंबूला भाव नसल्यामुळे निंबू उत्पादक आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने निंबू उत्पादक शेतकरी वर्गाचे होणारे नुकसान पहाता अनुदान त्वरीत जाहीर करावे अशी मागणी भातखेडे येथील शेतकरी भैय्यासाहेब ताराचंद पाटील, पुरुषोत्तम काशिनाथ पाटील, ताडे येथील शांताराम हेमराज पाटील या निंबू फळबाग बागायतदारांनी प्रसिध्दीस निवेदन देवून केली आहे.
सध्या कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर शासनाने लॉक डाऊन केल्यामुळे निंबूंच्या दळण वळणावर विपरीत परिणाम झाला त्यातच निंबूवर आधारीत काही उत्पादन करणाऱ्या कंपन्या बंद ठेवण्यात आल्यामुळे निंबूंची मागणी कमी होवून भाव पडलेत त्यामुळे नाका पेक्षा मोती जड म्हणजेच उत्पादना पेक्षा खर्च जास्त अशी दयनीय अवस्था उत्पादक शेतकऱ्यांची झाल्याने निंबूंचा बाजार काढणेच बंद केले आहे त्यामुळे निंबूच्या झाडाखाली सर्व निंबू पिवळे पडून गळून पडले आहेत निंबूंना व्यापारी नसल्याने सर्व माल निंबोणीच्या झाडाखाली सडत आहे.
सदर कारणाने निंबू, फळबाग, उत्पादक शेतकरी वर्ग हवालदिल होवून आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने निंबू फळबाग बागायतदारांना त्वरीत अनुदान जाहीर करावे, अशी मागणी भातखेडे येथील निंबू उत्पादक शेतकरी भैय्यासाहेब ताराचंद पाटील, पुरुषोत्तम काशिनाथ पाटील, ताडे येथील शांताराम हेमराज पाटील यांच्यासह शेतकरी वर्गाने केली आहे.