डेहराडून, लोकशाही न्यूज नेटवर्क
उत्तराखंडमध्ये गेल्या 48 तासांत धुवांधार पाऊस झाला आहे. अजूनही अनेक पर्वतीय क्षेत्रात अतिवृष्टीसारखा पाऊस पडतो आहे. या पावसामुळे हिमालयीन नद्यांना पूर आला आहे. डेहराडून- ऋषिकेश दरम्यानचा पूलच या पावसाने खचला. दोन मोठ्या शहरांना जोडणारा हा पूल अचानक तुटल्याने अनेक गाड्या वाहून गेल्या आहेत. या भागात आता रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. नेमकी किती हानी झाली याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाही. बरोबर मध्यभागीच पूल खचल्याने दोन्ही बाजूंच्या गाड्या पुरात अडकल्या. त्यातच बऱ्या अवस्थेत असलेल्या पुलाच्या भागातही हळूहळू भेगा पडत आहेत.
#WATCH | A bridge at Jakhan river on Ranipokhari-Rishikesh highway collapses in Dehradun, Uttarakhand
District Magistrate R Rajesh Kumar says traffic on the route has been halted. pic.twitter.com/0VyccMrUky
— ANI (@ANI) August 27, 2021
या आस्मानी संकटाचा गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याचा जोर वाढला आणि राणीपोखरी ते ऋषिकेश दरम्यान जाखन नदीवरचा पूल मधोमध खचला. उत्तराखंडचे जिल्हा अधीक्षक राजेश कुमार यांनी सांगितलं की, पूल खचल्यामुळे ऋषिकेशकडे जाणारी वाहतून थांबवण्यात आली आहे. डेहराडून, टिहरी, पौडी या जिल्ह्यांच्या काही भागात पुढचे 24 तास जोरदार पाऊस होणार असल्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उत्तराखंडच्या पाच जिल्ह्यांना दोन दिवसांपासून पावसाने झोडपलं आहे. दिल्लीसह उत्तर भारतातल्या अनेक राज्यांमध्ये ऑगस्टचा शेवटचा आठवडा मान्सून जोरदार बरसला आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे हरिद्वारमध्ये सुखी नदीला अचानक पूर आला आणि त्यात एक कार वाहून गेली.
उत्तराखंड हा डोंगरांचा आणि दऱ्यांचा परिसर असल्यामुळे एका भागात झालेल्या जोरदार पावसाचा परिणाम दुसऱ्या भागावर झाल्याचं अनेकदा दिसतं. डोंगर भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पातळीत अचानक वाढ होते आणि त्याचा परिणाम नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांच्या आयुष्यावर झाल्याचं अनेकदा पाहायला मिळतं.