अहमदाबाद :– एका क्षत्रिय राजपूत कुटुंबातील मुलीशी प्रेमविवाह केल्यानं दलित तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदाबादपासून १०० किलोमीटर अंतरावर असलेल्या मंडल तालुक्यात घडली. हरेश सोळंकी असे या हत्या करण्यात आलेल्या दलित तरुणाचे नाव असून त्याचं आठ महिन्यांपूर्वी उर्मिला या नावाच्या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण होत असताना घटनास्थळी उपस्थित असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्यानं तिथून पळ काढला.
आमच्या मुलीसोबत लग्न करण्याची हिंमत कशी केलीस, असा प्रश्न विचारत क्षत्रिय-राजपूत कुटुंबातील सदस्यांनी २३ वर्षीय हरेश सोळंकीची हत्या केली. लाठ्याकाठ्यांनी मारहाण करुन, सुरा भोसकून हरेशची हत्या केली गेली. लग्नामुळे झालेला वाद मिटवण्यासाठी हरेश त्याची पत्नी उर्मिलाच्या घरी गेला होता. सामंजस्यातून प्रकरण निवळावं यासाठी त्यानं राज्य सरकारनं स्थापन केलेल्या अभयम पथकाला फोन केला होता. त्यामुळे उर्मिलाच्या घरी जात असताना अभयम पथकातील पोलीस अधिकारी त्याच्यासोबत होती. मात्र हरेशला मारहाण केली जात असताना या अधिकारी महिलेनं घटनास्थळावरुन पळ काढला. त्यात त्याचा मृत्यू झाला.