मनमाड : नांदगाव तालुक्यातील वखारी येथे एकाच कुटुंबातील चार जणांची झोपेतच असताना तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चार आणि सहा महिन्यांचा मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नांदगाव तालुक्यातील वखारी भागात राहणारे चव्हाण कुटुंबीय हे नेहमी प्रमाणे आपल्या घराबारे झोपलेले होते. गुरुवारी मध्यरात्री मारेकऱ्याने समाधान चव्हाण (वय 37) भरताबाई चव्हाण (वय 32) गणेश चव्हाण (वय 6) आरोही चव्हाण (वय 4) अशा चौघांची झोपेतच तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली. मारेकऱ्याने आईच्या शेजारीच झोपलेल्या आरोहीच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. एकमेकांच्या जवळच झोपलेल्या कुटुंबातील चौघांची हत्या करण्यात आली. एकाच कुटुंबातील चौघांची हत्या का करण्यात आली, याचे कारण अद्याप कळू शकले नाही.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह ताब्यात घेतले आहे. चौघांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.एकाच कुटुंबातील चौघांची निर्घृण हत्या झाल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.