मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
आज दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यालयात एकाचवेळी छापेमारी सुरू झाली आहे. त्याला भास्कर समूहाच्या निर्भीड पत्रकारितेच्या कारणांची जोड असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ट्विटरवर अनेकांनी या समूहास पाठींबा देणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत.
दैनिक भास्कर समूहाच्या अनेक कार्यालयांवर देशभरातील प्राप्तिकर विभागाकडून छापा टाकला जात आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे, असे एनडीटीव्ही इंडिया यांनी म्हटलेले आहे. भास्करच्या दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील कार्यालयात शोध घेतला जात आहे. देशातील सर्वात मोठे वृत्तपत्र गट असलेल्या दैनिक भास्करने कोविडच्या दुसर्या लाटेच्या विध्वंसविषयी बातमी देण्यामध्ये मोठी आघाडी आघाडी घेतली होती.
आयकर अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितले की, भोपाळ, जयपूर आणि इतर ठिकाणी असलेल्या दैनिक भास्करच्या मीडिया ग्रुपच्या अनेक जागांवर छापे टाकण्यात आले आहेत. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळसह इंदूरमधील वर्तमानपत्राच्या कार्यालयांवर छापे टाकले जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. याशिवाय आयकर विभागाचे अधिकारी वृत्तपत्र समूहाच्या प्रवर्तकांच्या निवासस्थानाचीही झडती घेत आहेत. प्राप्तिकर विभागाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, या समूहाने कर चुकल्याची नोंद झाल्यानंतर हे छापे टाकले जात आहेत.
दैनिक भास्कर समूह हा देशातील सर्वात मोठा मीडिया समूह आहे, ज्याच्या वेगवेगळ्या भाषांमध्ये डझनभराहूनही अधिक राज्यांमध्ये 60 हून अधिक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्याचे मुख्यालय मध्य प्रदेशात आहे.