नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत सलग काही दिवस मोठी घट पाहायला मिळत होती. मात्र गेल्या 24 तासात कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 1 लाख 34 हजार 154 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 2 हजार 887 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत अल्पशी वाढ झाल्याने काहीशी चिंता व्यक्त केली जात आहे. तर, कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे.
गेल्या २४ तासात देशात 2 लाख 11 हजार 499 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 84 लाख 41 हजार 986 वर गेला आहे. देशात 2 कोटी 63 लाख 90 हजार 584 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 37 हजार 989 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 17 लाख 13 हजार 413 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.
आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 22 कोटी 10 लाख 43 हजार 693 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.