ओवेसी न आल्याने शिवतीर्थ मैदानाचा शुद्धीकरण कार्यक्रम रद्द
जळगाव –
देशात ठिकठिकाणी सभा घेत हिंदू बांधवांविरुद्ध गरळ ओकणारा असोद्दीन ओवेसी भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण करीत आहे. धर्मधर्मात वाद निर्माण करणारे वक्तव्य करून स्वतःचा राजकीय उल्लू साध्य करून घेत आहे. परंतु अशा ओवेसीला आपण सर्वांनी उत्तर देत एकजुटीने राष्ट्रीय सुरक्षा जपणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष तथा नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले आहे.
बहुजन वंचीत आघाडीचा सत्ता संपादन मेळावा शिवतीर्थ मैदानावर शुक्रवारी पार पडला. मेळाव्याप्रसंगी एमआयएम पक्षाचा खा.असोद्दीन ओवेसी हा देखील त्याठिकाणी येणार होता. त्यामुळे शिवतीर्थ मैदान अशुद्ध झाले असते. हिंदवी स्वराज्यासाठी कोणताही जातीयवाद न करता लढा देणार्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारसरणीला ओवेसीच्या शिवतीर्थ मैदानावर येण्याने ठेच पोहचली असती. त्यामुळे श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पंचामृतने विधीपूर्वक अभिषेक करण्याचे तसेच पंचामृत व गोमूत्र शिंपडून मैदानाचे शुद्धीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. परंतु ओवेसी न आल्याने शिवतीर्थ मैदान पूर्वीप्रमाणेच असल्याने कार्यक्रम रद्द करण्यात आला.
दरम्यान, कार्यक्रमासाठी सायंकाळी शिवतीर्थ मैदानावर जमलेल्या उपस्थीत देशभक्तांना मंडळाचे अध्यक्ष कैलास सोनवणे यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा केंद्रीय मुघल सलतनविरुद्ध संघर्ष होता. परंतु त्यांनी जातीयवादाला थारा न देता सर्व जाती धर्मांच्या लोकांना एका ध्वजाखाली आणले. मुस्लीम बांधवांना मानाचे स्थान दिले. परंतु ओवेसी नावाचे हे धूड देशात आजवर तोंडी तलाक मानून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेला जुमानत नाही. ओवेसी याने मुस्लीम बांधवांच्या न्याय, हक्कांसाठी लढा दिल्यास कुणालाही हरकत नाही. ओवेसी याचा संघर्ष बाबरी मस्जिद आणि अन्य अनुत्पादक बाबींविरुद्ध फिरताना दिसतो. ओवेसी हिंदूंचे दैवत भगवान श्रीरामांबद्दल अनुद्गार काढणे, मुस्लिमांच्या मनात हिंदूंबद्दल राग, भिती आणि द्वेष अशा नकारात्मक भावना निर्माण होतील असे वक्तव्य करण्याचे धंदे करीत असतो. ओवेसीसह त्याचा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हा देखील भडकाऊ वक्तव्य करीत असतो. दोघे भाऊ भारताच्या एकात्मतेला धोका पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजीत डोवाल यांनी देशाचे तुकडे होण्यामागे अंतर्गत दुही कारणीभूत असते, असे सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार ओवेसी हा देखील तेच एक तत्त्व असल्याचे कैलास सोनवणे यांनी सांगितले.