मुंबई । गेल्या काही महिने राज्यात कोरोना महामारीमुळं बिकट परिस्थिती तयार झाली होती मात्र आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे. राज्यात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ३ लाखांच्या पुढे गेली आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४५ हजार ९६१ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली.
राज्यात मंगळवारी पुन्हा एका दिवसात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांपेक्षा, नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होती. राज्यभरात मंगळवारी ७ हजार ७६० नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ५७ हजार ९५६ इतकी झाली. राज्यात मंगळवारी ३०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.
दरम्यान, राज्यभरात आत्तापर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या १६ हजार १४२ झाली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू दरात घट होवून, तो ३ पूर्णांक ५२ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यात एकूण १ लाख ४२ हजार १५१ कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ९ लाख ४४ हजार ४४२ लोक गृह विलगीकरणात तर ४३ हजार ९०६ लोक संस्थात्मक विलगीकरणात आहेत.