नवी दिल्ली : टाटा सन्सच्या चेअरमनपदी सायरस मिस्री यांची पुन्हा एकदा नियुक्ती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाने सायरस मिस्त्री यांच्या बाजूने बुधवारी महत्वाचा निर्णय दिला. मिस्त्री हेच टाटा समूहाचे अध्यक्ष असून नटराजन चंद्रशेखरन यांची टाटा समूहाचे नवे अध्यक्ष म्हणून केलेली निवड बेकायदा असल्याचा ऐतिहासिक निर्णय लवादाने दिला आहे.
सायरस मिस्त्री यांची २४ ऑक्टोबर २०१६ रोजी टाटा समूहातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली होती. त्याविरोधात त्यांनी राष्ट्रीय कंपनी लवादात याचिका दाखल केली होती. या लवादाने सायरस मिस्री यांना हटवण्याचा निर्णय बेकायदेशीर ठरवला आहे. सायरस मिस्री यांच्या जागी एन. चंद्रशेखरन यांची झालेली नियुक्तीही कोर्टाने बेकायदेशीर ठरवली आहे.
दरम्यान, मिस्त्री यांची टाटा समूहाचे कार्यकारी अध्यक्ष असल्याचा निर्णयाची चार आठवड्यांनी अमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे लवादाच्या निर्णयाबाबत दाद मागण्यासाठी टाटा समूहाकडे चार आठवड्यांचा अवधी आहे.