विश्वास ही अशी जादू आहे जी तुमच्याकडून काहीही करवून घेऊ शकते. समस्या कोणतीही असो ती विचारांच्या एक साखळीमुळे येते आणि विचारांची ही साखळी बदलता येते. त्याचा एकच उपाय आहे की तुम्ही तसा विश्वास ठेवा की मी या समस्येतून बाहेर येऊ शकतो किंवा मी हे काम करू शकतो. नकारात्मक विचार हे आपल्याला प्रगतीपासून दूर ठेवतात मी असाच आहे किंवा हे नेहमीच असतं असं तुम्ही किती तरी वेळा म्हणाला असाल कारण तुमच्या मनात तशी भावना आहे. म्हणून तेच विचार तुम्ही पुढे ठेवता किंवा हे आधी कोणीतरी म्हटले असते. ते तुम्ही खरच समजून त्याप्रमाणे चालता. असंच इतर समजुतीच्या बाबतीतही आहे. अचानक ढगाळी वातावरण बघितलं म्हणून अरे हे वातावरण जरा उदासच वाटत आहे, आता काहीच जमणार नाही, हे रोगीट वातावरण आहे असे म्हणाऱ्यांपैकी तुम्ही सुद्धा एक आहात.
हे वातावरण रोगीट नसून किती छान वातावरण आहे आणि आता पाऊस येणार. किती छान पाऊस पडणार असा विचार केला तर आपल्याला त्या पावसाचं स्वागत करता येईल. त्याचा मनसोक्त आनंद लुटता येईल आपलं आयुष्य आनंदात जावो असे जर आपल्याला वाटत असेल तर आपण तसा विश्वास ठेवायला हवा आणि आपण जो मनात विचार करू तेच आपल्यासमोर घडणार आहे.
सर्वप्रथम स्वतः वर विश्वास ठेवतांना कामाची चालढकल करू नका. जी काही शक्ती आहे ही वर्तमान काळातच साठवलेली असते. तुम्ही थांबलेले कधीच नसता. आपल्या मनात प्रत्येक वेळेस जे विचार येतात ते तुम्हाला पुढे नेतात. मनात काय नकारात्मक विचार चालू आहेत? आज जर आपण हा विचार करतो की माझा हात दुखत आहे, माझ्यात हा प्रॉब्लेम येईल तर खरंच तसे घडते. स्वतः मध्ये कमतरता शोधण्यापेक्षा तुमच्यात काय चांगले आहे ,कोणती स्किल चांगली आहे हे शोधा आणि त्यावर विश्वास ठेवा. कोणी सांगितल आहे किंवा लहानपणी पासून काही सांगितलेल आहे तेच खरं असेल हे आता पुसून टाका.
तुम्ही ते करू शकता. आपण ते करू शकतो असा विश्वास ठेवा. तुमच्या जगातले तुम्हीच राजे आहात आणि तुम्हीच सत्ताधारी. आजचा जो वर्तमान काळ आहे तो तुमच्या भूतकाळाच्या विचारांमुळे तयार झालेला आहे. तुम्ही आता जे काही निर्णय घ्याल त्या निर्णयाला विश्वास ठेवा. जो काही विचार कराल, जे काही बोलाल ते सर्व ह्या पुढच्या क्षणी, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षात तयार व्हायला मदत होणार आहे. तुम्ही जे मनात आणाल तेच होणार आहे. आतापासून विश्वास ठेवा आणि कामाला लागा. तुमच्यासाठी ही नवीन सुरुवात आहे आणि ती आत्ता या क्षणी आहे आणि ती तुम्हाला शक्तिमान बनवणार आहे. हा जो क्षण आहे तो बदल घडवून आणणार आहे आणि त्याचे परिणाम हे तुमच्या भविष्यावर सकारात्मक प्रभाव टाकेल.. ज्या विचारांमुळे तुम्हाला अडचणी येतील किंवा त्रास होईल असे विचार निवडणे म्हणजे मूर्खपणा आहे. ज्याने पोट बिघडतं ते आपण मुद्दामून खाऊ तर ह्यात मूर्खपणाच आहे.
तुम्ही काम करत राहा. तुमची भीती दूर होऊन जाईल. आपल्याला भीती लागते त्याचा खरोखर विचार करा आणि समोरचा माणूसच आहे, याच्या पलीकडे काय होईल असा विचार करून ते काम करा. तुमची जी आठवणीची बँक आहे ज्यात तुम्ही सर्व आठवणी ठेवल्या आहेत त्यापैकी केवळ सकारात्मक आठवणी जमा करायच्या आहेत. नकारात्मक विचार करून केवळ खाली पाडून तसा विचार करून स्वतःला मानसिक राक्षस बनू देऊ नका. आपल्याला अप्रिय असणारे लोक, अप्रिय घडलेली घटना किंवा तशी परिस्थिती यांची आठवण करणे बंद करा. लोकांना चांगल्या दृष्टिकोनातून पाहायला शिका आणि नेहमी आपल्या विचारांना दुसऱ्यांच्या प्रती संतुलित ठेवा. चांगल्या दृष्टीकोनाचा वापर करा. शेवटी तोही एक माणूसच आहे.
काम करताना तेच काम करा जे तुम्हाला योग्य वाटते. अयोग्य ते काम करून आपली अंतरात्मा खराब करून घेऊ नका. योग्य काम करणे हे यशासाठी सुद्धा महत्वाचे असते. आपल्या प्रत्येक कामात नेहमी आत्मविश्वास दिसला पाहिजेच आणि याचा प्रयोग तुमच्या दैनंदिन जीवनात छोट्या-मोठ्या गोष्टीत करा. उदा. नेहमी समोरच्या रांगेत बसा. बोलताना नेहमी दुसऱ्यांच्या नजरेला नजर मिळवून बोला. चालताना वेगाने चालायचा प्रयत्न करा. चार लोकांत बोलण्याचा प्रयत्न करा आणि तशी सवय पण लावा आणि बोलताना स्मितहास्य ठेवा. हे प्रयोग दैनंदिन जीवनात करून बघा आणि त्याचा सकारात्मक परिणाम अनुभवा.
ऋषिकेश मुकुंद पिहूलकर- 8208407724