मुंबई: राज्यात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढतच चालला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १०१ वर पोहोचली आहे. अशातच मुंबईत आणखी एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कस्तुरबा रूग्णालयात दाखल असलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. त्यांना काल संध्याकाळपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होत होता. दरम्यान आज या रुग्णाचा उपचार करत असताना मृत्यू झाला आहे. या मृत्युमुळं राज्यातील करोना बळींचा आकडा आता चारवर गेला आहे.
आज मृत्यू झालेला इसम १५ मार्च रोजी यूएईहून भारतात आला होता. प्रथम तो अहमदाबादेत आला व नंतर मुंबईत आला होता. ताप, खोकला व श्वसनाच्या त्रासामुळं संबंधित व्यक्तीला २३ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्याला उच्च रक्तदाब आणि डायबेटिसचा विकारही होता. ‘करोना’च्या आजाराची लक्षणं असल्यानं त्याची तातडीनं चाचणी करण्यात आली होती. त्यात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. विलगीकरण कक्षात त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उत्तरोत्तर प्रकृती खालावत जाऊन आज त्याचा मृत्यू झाला. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.