चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गुलाब वादळामुळे जळगाव जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय. यामुळे चाळीसगावला पुन्हा मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगरी आणि तितूर नदीला पूल आला असून शहरातील पुलावरून पाणी वाहू लागले आहे.
चाळीसगाव शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये ३० ऑगस्टच्या रात्री झालेल्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली होती. यानंतरही पावसाचे प्रमाण वाढतच राहिले आहे. यातच काल रात्री चाळीसगाव शहरासह तालुक्यातील बहुतांश भागांमध्ये जोरदार पाऊस पडला. यामुळे तितूर आणि डोंगरी नद्यांसह परिसरातील सर्व नाल्यांना मोठा पूर आला आहे. विशेष बाब म्हणजे डोंगरी आणि तितूर या दोन्ही नद्यांना एकाच महिन्यात पाचव्यांदा पूर आलेला आहे. शहराच्या मधून जाणार्या नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे येथील रहदारी बंद झालेली आहे. तर काही भागांमध्ये पाणी शिरल्याची माहिती देखील समोर आली आहे. पुराचे पाणी बाजारात शिरले आहे. याशिवाय अनेक भागांतील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
या पुरामुळे नव्या आणि जुन्या गावचा संर्पक तुटला आहे. तर दुसरीकडे देवळी गावाजवळ चाळीसगाव-मालेगाव रस्त्याचे काम सुरु असल्याने कडेला असलेला भराव मंगळवारी झालेल्या पावसामुळे वाहून गेला आहे.