खळबळजनक.. चार लेकरांसह आईची विहिरीत उडी

0

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क 

कौटुंबिक वादातून विवाहितेने आपल्या चार लेकरांसह आत्महत्या केली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे ही हदय पिळवून टाकणारी घटना उघडकीस आली आहे.

तीन मुली आणि एका मुलासह महिलेने विहिरीत उडी घेऊन आपल्या आयुष्याची अखेर केली. या घटनेने अंबड तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पार्वती (नाव बदलले आहे) या विवाहित महिलेने तीन मुली आणि एका मुलासोबत आत्महत्या केली. काल (गुरुवार 30 डिसेंबर रोजी) दुपारी 12 ते 1 वाजताच्या सुमारास पार्वती आपल्या तीन मुली आणि लेकासह शेतात चक्कर मारायला गेल्याचं अनेकांनी पाहिलं होतं. पार्वती यांनी आपल्या मुला-मुलींसह सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत शेतातच वेळ घालवला.

संध्याकाळचे सात वाजले, तरीही पार्वती आणि चारही लेकरं घरी परत आली नाहीत. त्यामुळे त्यांचे पती आणि गावातील नागरिकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध घेऊनही ते कुठेच सापडले नाहीत. परिसरातील सर्व विहिरी आणि जायकवाडी डावा कालवा परिसर पिंजून काढला, मात्र पाचही जण आढळून आले नाहीत.

रात्र झाली तरीही घरी न आल्यामुळे कुटुंबीय आणि गावातील काही लोकांनी त्यांचा शोध सुरू केला. गावकरी आणि कुटुंबातील सदस्यांनी आजूबाजूची शेतं आणि विहिरी पिंजून काढल्या. त्यानंतर रात्रभर शोध घेऊनही ते सापडले नव्हते. परंतु सकाळीच काही जणांच्या नजरेत त्यांच्या शेताच्या शेजारच्या विहिरीत या पाचही जणांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आले.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.