ऑलिम्पिक तयारीसाठी मुलांना लहानपनीच प्रोत्साहन देण्याची गरज-अरविंद रमेश प्रभू

0

मुंबई : प्रतिनिधी 

श्री पार्लेश्वर व्यायाम शाळा यूट्यूब चैनल वरील मल्लखांब कट्टा मध्ये आपण वेगवेगळे क्रीडा विषय घेऊन येतो. त्याच प्रमाणे  ह्या रविवारी इंटरॅक्शन विथ स्पोर्ट्स सेंटर प्रेसिडेंट हा विषय घेऊन लोकांसमोर यायचे ठरले. आजच्या या मुख्य सत्रासाठी, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (रजि.) प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष श्री अरविंद प्रभू हे उपस्थित होते. तसेच ते मल्लखांब संघ अंधेरी चे देखील अध्यक्ष आहेत.

अरविंद  प्रभू आपले विचार मांडताना म्हणाले  की छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती जो आम्ही प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल म्हणून चालवतो तो क्लब नाही तर ते क्रीडा संकुल आहे. आमच्याकडे रेस्टॉरंट, बार, कार्ड झोन नाही फक्त खेळ सुखसुविधा आहेत. 1996  मध्ये माझे वडील डॉ. रमेश यशवंत प्रभू ( मा.महापौर,मा. आमदार)  यांनी ही संकल्पना केली. तेव्हा दादर पासून बोरीवली पर्यंत कोणताच  ऑलम्पिक आकाराचा जलतरण तलाव नव्हता म्हणून त्यांनी ठरवले कि विलेपार्ले नगरीत जर ऑलम्पिक पातळीचा जलतरण तलाव झाला तर लाखो लोकांना त्याचा वापर करता येईल. गेल्या वीस-बावीस वर्षांत हजारोंच्या पट्टीत लोकांना पोहण्याचे प्रशिक्षण दिले आहे आणि बऱ्याच प्रमाणात मुले आज राज्य – राष्ट्रीय पातळीवर खेळत आहेत याचा आम्हाला खूप आनंद आहे. अरविंद  प्रभू सांगतात माझ्या वडिलांचा जो विचार होता की हेल्दी लाइफस्टाइल हे आम्ही या संकुलाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. आज संकुलात चार वर्षांच्या मुलांपासून ते सत्तर ऐंशी वर्षाच्या तरुणांपर्यंत सर्व वयोगटातील लोक खेळण्यासाठी येतात. ऑलम्पिक मध्ये एक तरी खेळाडू आमच्या संकुलातील असेल व आपल्या भारत देशाचे नाव मोठे करेल हा आमचा उद्देश आहे आणि आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करतो आहोत.कॅच देम यंग म्हणजे लहान वयातील जास्तीत जास्त मुलांना खेळ खेळण्यास प्रोत्साहित करण्याचा आमचा हेतू असतो.  इथे आल्यावर कोणीही  मुले उगीच मोबाईलवर नसतात. आमच्या येथील मुलांपासून  पालक सर्वजण शिस्तबद्ध आहेत. त्यांना वेगळी शिस्त लावावी लागत नाही असे आमच्या संकुलाचे वातावरण आहे. येथे मुलांना लहानपणापासूनच एक आदर्श  नागरिक बनवण्यास आम्ही शिकवतो. आमच्या संकुलात वेगवेगळ्या खेळा प्रमाणेच मुले आपल्या शिक्षकाला आदराने नमस्ते करतात, साधनाला वंदन करतात नंतर प्रशिक्षणाला सुरुवात करतात.अरविंद प्रभू सांगतात की मल्लखांब हा असा खेळ आहे की ज्यामुळे मज्जा संस्था, लवचिकता व स्नायूंची बळकटी वाढते त्यामुळे मुलांनी लहानपणापासूनच  मल्लखांबाची सुरुवात केली पाहिजे. मल्लखांबामुळे एकाग्रता आणि स्नायुंमधिल ताकद वाढते त्याचा फायदा आपल्याला दुसरे खेळ खेळण्यास होतो. मल्लखांब हा बिगिनिंग ऑफ ऑल कॉम्पिटिटिव्ह स्पोर्ट्स आहे. मल्लखांबातील शिस्त देखील खूप छान आहे. मल्लखांबाला एक चांगला दर्जा दिला गेला पाहिजे म्हणुन माझ्या आईने म्हणजे डॉ.पुष्पा रमेश प्रभू नी मल्लखांबाच्या निमंत्रित महापौर व वडिलांच्या नावाने सुरू केलेल्या RYP स्पर्धा भरवल्या. स्पर्धेचा दर्जा खूपच चांगला असला पाहिजे असा आईचा हट्टच होता . जेवढ्या चांगल्या दर्जाचा आपण खेळ बघतो तेव्हा तो तसा खेळण्यासाठी आपण प्रोत्साहित होतो.  आम्ही नवीन मुलांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतो.आजही संकुलात आम्ही कमीत कमी पैशात जास्तीत जास्त सुख सुविधा देण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला या संकुलात क्रिडा वाचनालय सुरु करायची इच्छा आहे. सध्या आम्ही एक वर्ग बनवलाय त्यात इंटरनेट सुविधा आहे, कम्प्युटर आहे ज्याला पाहिजे तेथे जाऊन तो खेळाबद्दल पाहिजे ती माहिती मिळवू शकतो.  या सत्राचे सूत्रसंचालन मल्लखांब संघ अंधेरी चे सचिव व श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे प्रशिक्षक श्री गणेश देवरुखकर  यांनी केले. तसेच महेश अटाळे सरांनी या चर्चासत्रासाठी पुढाकार घेतला.

Leave A Reply

Your email address will not be published.