मँचेस्टर :- भारताची फलंदाजी विरुद्ध न्यूझीलंडची गोलंदाजी, असे चित्र आज, मंगळवारी रंगणाऱ्या वनडे वर्ल्डकपच्या भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरीत दिसेल.
दोन वेळा विश्वविजेत्या ठरलेल्या भारताने साखळी फेरीवर पूर्णपणे वर्चस्व गाजवत नऊपैकी सात सामने जिंकून गुणतालिकेत अव्वलस्थानी धडक मारली. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाला होता. चौथ्या क्रमांकाचा अनुत्तरित तिढा आणि खेळाडूंच्या दुखापती यावर मात करत भारतीय संघाने मोठी मजल मारली आहे. मात्र आता भारतासमोर काहीशा अस्थिर असलेल्या न्यूझीलंडचे आव्हान असेल.
२०१५च्या विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंडनेही धडाक्यात सुरुवात केली होती. मात्र अखेरच्या टप्प्यात निराशाजनक कामगिरी केल्यामुळे त्यांना जेमतेम उपांत्य फेरी गाठता आली.