किनोद येथील नदीपात्रात ग्रामस्थांच्या पुढाकारातून कारवाई
जळगाव, दि. ६-
तालुक्यातील किनोद येथील तापी नदी पात्रात ग्रामस्थांनी अवैध वाळू वाहतूक करणारे ११ ट्रॅक्टर पकडले. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस कर्मचार्यांना कळवले. महसूल आणि पोलीस कर्मचार्यांनी हे ट्रॅक्टर ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात जमा करणायत आले आहेत. ही कारवाई सोमवारी सकाळी ८.१५ वाजता झाली.
सुटकार येथील तापी नदीच्या पात्रात वाळूचा ठेका देण्यात आला आहे. परंतु या वाळू वाहतूक करणाऱ्यांनी सुटकार ऐवजी किनोद येथील नदी पात्रातील वाळूची अवैध वाहतूक काही दिवसापासून नियमित सुरु ठेवली होती. दरम्यान सोमवारी वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती ग्रामस्थांना लक्षात आली. त्यांनी नदी पात्रात धाव घेऊन अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकांची हवा काढली. या ट्रॅक्टरचे चालक मात्र पसार झाले आहेत. याबाबत कळताच तहसीलदार वैशाली हिंगे, मंडळ अधिकारी दिनेश उगले, तलाठी किरण सपकाळे, एपीआय गणेश चव्हाण, हवलदार अशोक चौधरी, ईश्वर लोखंडे, श्यामकांत बोरसे, आदींनी कारवाई केली.
आरटीओ मार्फत या ट्रॅक्टर मालकांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यांनी दंड न भरल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करणायत येईल, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान या अगोदर २७ मार्च रोजी महसूल विभागाने २ ढपर पकडले होते. या नंतरही कारवाई सत्र सुरूच राहील, असा इशारा महसूल विभागाच्या सूत्रांनी दिला आहे.