नवी दिल्ली: देशभर विस्तारलेल्या रेल्वेच्या जाळ्यातील १५० ट्रेनचे खासगीकरण तसेच ५० रेल्वे स्थानकांच्या जागतिक निकषांनुसार विकास करण्याबाबतचा आराखडा तयार करण्यासाठी रेल्वेने विशेष गटाची स्थापना केली आहे. ही प्रक्रिया कालबद्धरित्या पूर्ण करण्यासाठी अधिकारप्राप्त गटाची स्थापना करण्याबाबत नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांना ७ ऑक्टोबर रोजी पत्र लिहिले होते. त्यानंतर रेल्वेने हा आदेश काढला आहे. या गटात कांत आणि यादव यांच्यासह आर्थिक व्यवहार आणि गृहनिर्माण आणि नगरविकास या खात्यांचे सचिव, रेल्वेचे वित्तीय आयुक्त, इंजिनीअरिंग रेल्वे बोर्ड आणि ट्रॅफिक रेल्वे बोर्डाचे सदस्य यांचाही समावेश असेल. निविदा प्रक्रियेला मान्यता देणे हा या गटाचा अधिकार असेल. तसेच निविदा प्रक्रियेवर देखरेख ठेवणे आणि प्रकल्प कालबद्धरित्या पूर्ण व्हावेत, यासाठी निर्णय घेणे ही या गटाची जबाबदारी असेल. लखनऊ ते दिल्ली या मार्गावर धावणारी तेजस एक्स्प्रेस ही खासगीकरण झालेली पहिली रेल्वे आहे. ४ ऑक्टोबरपासून ही एक्स्प्रेस सुरू झाली.