पाचोरा (प्रतिनिधी) –नगरदेवळा येथील १४ व्या वित्त आयोगाच्या रकमेचा अपहार केल्या प्रकरणी सरपंच यांना अपात्र तर ग्रामविकास अधिकारी हे निलंबित झाले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जळगांव यांनी दिले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, नगरदेवळा ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असून कोणत्या न कोणत्या कारणास्तव चर्चेत राहिली आहे. सुनंदाबाई पाटील हे गेल्या दोन ते अडीच वर्षापासून सरपंच पदावर कार्यरत असून त्यांनी शासकीय जागेत अतिक्रमण केल्याबद्दल त्यांना जिल्हाधिकारी जळगांव व विभागीय आयुक्त नाशिक यांनी अपात्र ठरविले होते परंतु त्यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली असता जिल्हाधिकारी यांनी त्यांचे सदस्य पद व सरपंच पद कायम ठेवले होते. परंतु पदावर कार्यरत असताना सरपंच यांनी १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून पती नामदेव भावडू पाटील यांच्या नावे १लाख ३० हजार रुपयाचा धनादेश काढला होता तसेच एस एस पाटील(तत्कालीन ग्राविअ) यांनी १ लाख ४५ हजार रुपयांचा धनादेश काढून अपहार केला व ग्रामविकास अधिकारी ए एम राठोड यांनी त्यांना मदत केली अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्या सिंधुताई सुधाकर महाजन यांनी दि. १६/४/१८ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी जळगांव यांच्याकडे दाखल केली होती. सदर तक्रारींवर २१/६/१८ जिल्हाधिकारी जळगांव यांनी आदेश पारीत करत अर्जदार यांचा विवाद अर्ज क्र.३७/२०१८ मंजूर करत सरपंच यांनी सण २०१७/१८ या वर्षात १४ वित्त आयोग योजनेचे कोणतेही काम नसतांना त्यांचे पती नामदेव भावडू पाटील यांचे नावे ४/७/१७ रोजी १ लाख ३०हजार रुपये बेकायदेशीर काढून ग्रामपंचायतिच्या कामात हितसंबंध निर्माण केल्याचे निर्विवाद सिद्ध होत असल्याने सरपंच यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम१४(ग) नुसार नगरदेवळा ग्राप सदस्य म्हणून राहण्यास अपात्र घोषित करण्यात येत आहे तसेच ग्रामविकास अधिकारी ए एम राठोड यांनी सदर कामात सरपंच यांना सहकार्य केल्याने व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी एस एस पाटील यांनी देखील १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून १ लाख ४५ हजार रुपये बेकायदेशीर काढल्याने दोघांना निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करून कठोर कार्यवाही करणेबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जळगांव यांना आदेशीत केले आहे.
पुन्हा सरपंच पदासाठी समीकरणे
सदर निकालाने गावातील सरपंच पद रिक्त झाल्याने नवीन राजकीय समिकरणांची पुन्हा जुळवाजुळव सुरू होणार असून या बाबत सिंधुताई सुधाकर महाजन, मालतीबाई प्रदीप परदेशी व छायाताई प्रकाश परदेशी यांच्या नावाची गावात चर्चा असून सरपंच पदी कुणाची वर्णी लागते हे बघणे उत्सुकतेचे ठरेल.