स्वामी असीमानंदांसह ५ आरोपींची निर्दोष सुटका

0

नवी दिल्ली – राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) विशेष न्यायालयाने आज मक्का मशीद प्रकरणी अंतिम निर्णय घोषित करत सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. १८ मे २००७ला येथील मक्का मशीदीवर झालेल्या हल्ल्यात नऊ जणांचा मृत्यू व ५८ जण जखमी झाले होते.

एनआयएच्या नामपल्ली येथील विशेष न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर आज निकाल घोषित करण्यात आला. १० जणांविरुद्ध या प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्यापैकी पाच आरोपींविरोधी खटल्याचा आज निर्णय देण्यात आला. सर्व आरोपींना न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष घोषित केले आहे.

एमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी एनआयए विशेष न्यायालयाच्या निर्णयावर असामाधान व्यक्त करत एनआयए तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २०११मध्ये सीबीआयकडून हे प्रकरण एनआयएने स्वतः कडे घेतले होते. या प्रकरणी १० जणांवर आरोप दाखल करण्यात आले होते. किंबहुना यापैकी पाच जणांना अटक करण्यात येऊन त्यांच्याविरुद्ध खटला चालविण्यात आला. पाच आरोपींमध्ये देवेंद्र गुप्ता, लोकेश शर्मा, स्वामी असीमानंद, भरत मोहनलाल रतेश्वर व राजेंद्र चौधरी यांचा समावेश होता.

इतर दोन आरोपी संदीप डांगे व रामचंद्र कलसंग्रा फरार होते. तर सुनील जोशी या मध्य प्रदेशमधील आरोपीची तपासादरम्यान हत्या करण्यात आली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.