जळगाव प्रतिनिधी : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळगावातील दौऱ्यादरम्यान स्वबळाची भाषा करत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना एक प्रकारे इशारा दिला आहे. ‘स्वबळ म्हणजे काय असते ते मला माहीत नाही. पण जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे बळ नक्कीच आहे. त्यामुळं कोणत्याही पद्धतीनं निवडणुका लढण्याची तयारी आणि मानसिकता आमच्या सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आहे, असं सांगत, जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले.
शिवसेनेचे खा. संजय राऊत जळगावच्या दौऱ्यावर आले आहे. आज सकाळी त्यांनी जळगाव लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जळगावचे संपर्कप्रमुख संजय सावंत, सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, आमदार चिमणराव पाटील, किशोर पाटील, महापौर जयश्री सोनवणे उपस्थित होते.
या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ‘उत्तर महाराष्ट्राचा हा दौरा संघटनात्मक बांधणीसाठी आहे. राज्यातील सरकार किंवा सत्ता हे एका बाजूला आहे. ते राज्याच्या विकासाचं व प्रशासनाचं काम करत आहेत. शेवटी ज्या संघटनेमुळे ही सत्ता आहे, त्या संघटनेला, शिवसैनिकांना बळ देण्यासाठी, त्यांच्यापर्यंत पोहचण्यासाठी हा दौरा आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचं संघटन अत्यंत सक्रिय आणि मजबूत आहे. मुंबई व कोकणनंतर जळगाव जिल्ह्यानं शिवसेनेला सर्वाधिक आमदार देण्याचं काम केलं आहे. त्याबद्दल या जिल्ह्याविषयी कृतज्ञता आहे. जळगाव जिल्ह्यातील राजकारणाचे पडसाद राज्यातील राजकारणावर उमटत असतात, असंही ते म्हणाले.
‘निवडणूक महापालिकेची असेल, जिल्हा परिषदेची असेल, विधानसभेचीच काय लोकसभेची जरी असली तरी ती आम्ही स्वबळावर लढू आणि जिंकू. शिवसेनेने जिल्ह्यात आमदार दिले, महापौर दिले. आता आपण खासदार देऊ, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. त्यांच्या भावना मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे, असं सूचक वक्तव्यही राऊत यांनी केलं.