स्वच्छ भारत मिशनअंतर्गत देशात ४६वा क्रमांक ; नगराध्यक्षा साधना महाजन यांची माहिती
जामनेर ;– स्वच्छ भारत मिशन अंतर्गत देशातून जामनेर पालिकेचा ४६ वा तर नाशिक विभागातून प्रथम क्रमांक आला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा साधना महाजन यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर ४ जानेवारी ते १५ मार्च या कालावधीत स्वच्छ भारत मिशन स्पर्धा राबवली. त्यात देशभरातून ४०४१ तर नाशिक विभागातून ५० नगरपालिका सहभागी झाल्या होत्या. त्यात जामनेर पालिकाही सहभागी झाली होती. या अभियानाच्या काळात जामनेर पालिकेने शहराच्या स्वच्छतेसाठी पथनाट्यातून जनजागृती, ग्रामस्थांना ओला व सुका कचरा वेगळा करून साठविणे, आपला परिसर स्वच्छ ठेवणे, सर्वसमावेशक मोहिम राबवून शहर स्वच्छ ठेवणे असे उपक्रम राबविण्यात आले. यात प्रामुख्याने वैयक्तिक शौचालयासाठी प्रोत्साहनपर अनुदान दिले. आवश्यक त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय बांधून शहर हागणदारीमुक्त केले. अशाप्रकारे शहर स्वच्छ व सुंदर केले. जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहर विकासासाठी निधी दिला.
मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, सर्व कर्मचारी, सर्व नगरसेवकांनी सहकार्य केले. त्यामुळेच जामनेरला देशातून ४६ वा तर नाशिक विभागातून प्रथम क्रमांक मिळाला आहे. यामुळे जामनेर शहराला पाच कोटी रूपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असून त्यातून शहर स्वच्छतेचा उपक्रम राबविला जाणार आहे अशी माहिती नगराध्यक्षा महाजन यांनी दिली.
नगरपालिकेला२८२७ गुण
स्वच्छ भारत मिशन स्पर्धेत हागणदारी मुक्ती, जनजागृती करून लोकांचा सांघिक सहभाग वाढवणे अशा विषयांना महत्व दिले होते. सर्वेक्षण करून त्यासाठी ४००० गुण निश्चित केले होते. पैकी पालिकेला २८२७ गुण मिळाले. यासाठी मंत्री महाजन, नगराध्यक्षा साधना महाजन, नगरसेवकांचे सहकार्य मिळाले.