मृत्यूसाठी डॉ.आयुषी याच जबाबदार असल्याचे गुप्त पत्र सापडले
इंदूर : दिवंगत लोकप्रिय संत भय्यूजी महाराज यांच्या मृत्यूचे गूढ आता समोर आले आहे. त्यांच्या मृत्यूसाठी डॉ. आयुषी याच जबाबदार असल्याचे, एक गुप्त पत्र पोलिसांना मिळाले आहे. डीआयजी हरिनारायणचारी मिश्र यांना ११ पानांचे एक पत्र मिळाले. हे पत्र भय्यू महाराजांच्या एका ‘विश्वासू सेवका’ने पाठवल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे. परंतु, आपल्याला भय्यू महाराज यांच्या मृत्यूचे गूढ माहिती आहे परंतु, आपल्या जीवाला धोका असल्याने आपण स्वत:चे नाव जाहीर करू शकत नसल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दिवंगत संत भय्यू महाराज यांच्या आयुष्यात कलह त्याच दिवशी सुरू झाला होता ज्या दिवशी त्यांनी डॉ. आयुषीसोबत विवाह केला होता. आयुषीने पहिल्यांदा त्यांना कुटुंबीयांपासून तोडले. त्यानंतर आश्रमात भाऊ, काकाला बोलावून घेतले. मुलगी कुहूपासूनही त्यांना तोडण्याचा प्रयत्न केला, असेही या पत्रात म्हटले आहे.
भय्यूजींच्या पहिल्या पत्नीबद्दल चर्चा केली तर आयुषीच्या रागाचा भडका उडत होता. घरातील त्यांचे फोटोही हटवण्यात आले होते. महाराजांना कुहूशी बोलण्यापासूनही परावृत्त केले होते. महाराजांना आपल्याच नातेवाईकांशी लपून-छपून बोलावे लागत होते. आयुषीचा भाऊ अभिनव आणि काका उमेश शर्मा आश्रमाकडून वेतनही घेऊ लागले होते. गेल्या दोन वर्षांपासून भय्यूजी महाराज तणावाखाली होते. डॉ. आयुषीसोबत विवाहानंतर ते एकटे पडले होते, असाही उल्लेख या निनावी पत्रात करण्यात आला आहे.