शुक्रतारा निखळला ; अरूण दाते यांचे निधन

0

मुंबई: मराठी भावगीतकार अरूण दाते यांचे आज निधन झाले. मराठी रसिकांच्या ह्रदयावर त्यांनी आपल्या अवीट गोडीच्या आवाजातील भावगीतांद्वारे अधिराज्य गाजवले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांचा 84 वा वाढदिवस होता. अरुण दाते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. आज पहाटे ६ वाजता त्यांनी कांजुरमार्ग येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला.
’या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, असं म्हणत आयुष्यावर प्रेम करायला शिकवणारे अरुण दाते यांचे आज निधन झाले. भातुकलीच्या खेळामधली, शुक्रतारा मंदवारा, शतदा प्रेम करावे, स्वरगंगेच्या काठावरती अशी अनेक गाणी अरुण दाते यांनी त्यांच्या सुरेल आवाजानं अजरामर केली. शुक्रतारा मंदवारा हे अरुण दाते यांचं गाणं अतिशय गाजलं.
अरुण दातेंचे वडील रामूभैय्या दाते हे इंदूरमधील प्रतिष्ठेचे गायक होते. त्यांच्या इच्छेनुसार अरुण दाते गायक झाले. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे सुरुवातीला गाणे शिकले. त्यांनी पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले.
दाते यांनी मुंबईमध्ये कापड अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथे भेटलेल्या पु.ल.देशपांडे यांनी रामूभैय्या दातेंना त्यांची शिफारस केली. अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षीच्या परीक्षेत अरुण दाते नापास झाल्यावर वडिलांनी त्यांना गाणे शिकण्याचे प्रोत्साहन दिले.
अरुण दाते 1955पासून आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत त्यांनी भावगीतांवर आपले लक्ष केंद्रित केले. 1962मध्ये शुक्रतारा मंदवारा ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक त्यांना आग्रह करीत. आपण हिंदीभाषिक प्रदेशातील असल्याने मराठी उच्चार शुद्ध नसल्याचे कारण सांगून दाते यांनी सुरुवातीला तीन वर्षे ते गाण्याचे टाळले. शेवटी एकदा ते ध्वनिमुद्रित झाले आणि अफाट गाजले. पुढे अरुण दाते आपल्या कार्यक्रमांतही ‘शुक्र तारा’ गाऊ लागले. इ.स. 2010पर्यंत अरुण दाते यांचे शुक्रतारा या नावाने होणार्या मराठी भावगीत गायनाचे 2500हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बमही लोकप्रिय आहेत.
मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत लोकप्रियता प्राप्त करून दिली असे म्हणले जाते.अरुण दाते यांनी लता मंगेशकर, आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती यांबरोबर द्वंद्वगीते गायली आहेत.
अरुण दाते यांनी ‘शतदा प्रेम करावे’ या नावाचे एक आत्मचरित्र लिहिले आहे. हे पुस्तक पूर्वी 1986 साली प्रसिद्ध झाले होते, पण बाजारात मिळत नसल्याने नव्याने प्रकाशित होत आहे.
पहिला गजाननराव वाटवे पुरस्कार ,शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलेले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.