शिवांगी ब्रेकर्स कंपनीविरोधात कामगारांचे कामबंद आंदोलन

0

खामगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

येथील शिवांगी ब्रेकर्स कंपनी मधील कामगारांवर कंपनी संचालकांकडून अनेक वर्षांपासून अन्याय होत असल्याचा आरोप करत अन्याय दुर व्हावा व कामगारांना त्यांचा हक्क मिळावा यासह विविध मागण्यांसाठी कामगारांनी कंपनी प्रशासनाविरोधात कामबंद आंदोलनाचा हत्यार उपसले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात कंपनीसमोर आज दि.१० डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता पासून कामगारांनी कामबंद आंदोलनास सुरूवात केली आहे.  या आंदोलनामुळे संचालकांवर कंपनी बंद ठेवण्याची नामुष्की ओढावली आहे.

येथील पारले जी बिस्किट बनविणारी नामांकीत शिवांगी ब्रेकर्स कंपनी जनुना शिवारात आहे. या कंपनीमध्ये ६०० च्या जवळपास कामगार काम करतात. परंतु गेल्या काही वर्षांपासून कंपनीचे संचालक कामगार कायद्यानुसार वेतन न देता कामगारांचे शोषण करीत आहेत. तसेच या ना त्या कारणाने कामगारांना  घरी बसवून पगार कपात, बेकायदेशीर गेट पास देवून कामावरून कमी करणे, साप्ताहिक सुट्टी न देणे, नियमानुसार पगार वाढ न करणे, अशा प्रकारे अनेक कारणांनी कामगारांना त्रास देण्याचा प्रकार सुरू आहे. तसेच येथे अगोदर पासून असलेल्या सात्विक युनियन संघटनेने संचालकांशी आर्थिक सलगी साधून कामगारांच्या प्रश्नांवर आवाज उठविण्याऐवजी कामगारांनाच त्रास देण्याचा प्रयत्न चालविला आहे. या सर्व त्रासाला कंटाळून कामगारांनी मोठ्या संख्येने एकत्रित येत महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासद स्विकारले आहे.

त्यानुसार कंपनी  संचालकांशी वेळो वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून कामगारांवर अन्याय करु नका, त्यांना त्यांचा हक्क द्या. फक्त संवादच नाही तर संबंधित संचालकांबरोबर लेखी पत्रव्यवहार सुध्दा केला. परंतु मुजोर कंपनी संचालकांनी मनसेचे सभासद स्विकारलेल्या कामगारांसह सर्वांनाच त्रास देने सुरू ठेवले. त्यामुळे संचालकांच्या त्रासाला कंटाळून कामगारांनी एकत्र येत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतृत्वात कंपनी कामबंद आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शुक्रवारी सकाळी ७ वाजतापासून कंपनीसमोर कामगारांनी लोकशाही मार्गाने आंदोलनास सुरूवात केली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे नेते निलेश पाटील, अक्षय पनवेलकर यांनी मुंबई येथून थेट खामगाव गाठत या आंदोलनात सहभाग घेतला.  तर मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी कामगारांशी व्हिडीओ कॉलिंग करून संवाद साधला आणि त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. दरम्यान मनसेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विठ्ठल लोखंडकार, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवा लगर, जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील, शहराध्यक्ष आनंद गायगोळ, शहर उपाध्यक्ष आकाश पाटील, अभिजित महानकर यांनी कामगारांची चर्चा केली व आंदोलनात सहभागी झाले. आंदोलनामध्ये कामगार गोपाल चरखे, दिलीप गिठ्ठे, राम शिंदे, विशाल घोगले, मनोज लांडगे, प्रशांत सुरोशे, निलेश श्रीनाथ, गजानन घ्यार, भागवत ठाकरे, नितीन कोळसे, भरत वरघट, दीपक मोडकर, आकाश कोल्हे ,राहुल येडे, दीपक वानखडे, प्रविण तायडे विलास वरघट, विजय मांडवेकर यांच्यासह शेकडो कामगार सहभागी झाले आहेत. कामगार आंदोलनात सहभागी असल्यामुळे कंपनी बंदच्या स्थितीत दिसून आली.

कंपनी संचालकांनी सात्विकतेचा आव आणून कामागारांच्या आंदोलनाला मज्जाव घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आज कामागांनी एकजुट राहत आंदोलन सुरू करून त्यांच्या एकजुटीचे दर्शन घडवून दिले आहे. तर जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.

कामगारांच्या प्रमुख मागण्या

२६ दिवसांचा कामाचा करारनामा करण्यात यावा, नियमानुसार कंपनीने किमान वेतन नुसार वेतन द्यावे, सर्व कामगारांना साप्ताहिक सुट्टी मिळावी, ओव्हरटाईमचा मोबदला नियमानुसार मिळावा, पगारावर पुर्ण बोनस मिळावा, कामगारांना बेकायदेशीर नोटीसा देणे बंद झाल्याच पाहिजे, सर्व कामगारांची पगार वाढ झालीच पाहिजे, बेकायदेशीर गेट पास बंद झाल्याच पाहिजे, कंपनी संचालकाकडुन कामगारांना देण्यात येणारा त्रास बंद झालाच पाहिजे, कामगारांचे कामाचे डिपार्टमेंट (विभाग) बदलवने थांबलेच पाहिजे अशा विविध मागण्याकरीता आजपासून आंदोलन सुरू आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.