मुंबई : शिवसेना-युवासेना आणि राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या विभागातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मनसेचा झेंडा हाती धरला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सेना-राष्ट्रवादीच्या हजारो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये प्रवेश केला.
महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार स्थापन झाल्यानंतरही स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद दिसून येत आहे. स्थानिक नेत्यांची मनमानी, मान-सन्मान किंवा पद मिळत नाही, वरिष्ठ नेत्यांसमोर समस्या मांडूनही होणारं दुर्लक्ष यासारख्या कारणांमुळे सेना-राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मनात खदखद होती. अखेर ती पक्षांतराच्या रुपाने बाहेर पडली.
दरम्यान, राज ठाकरे आगामी काळात हिंदुत्वाच्या राजकारणाकडे झुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी 23 जानेवारीला राज ठाकरे यांनी पक्षाचं पहिलं महाअधिवेशन आयोजित केलं आहे. ‘या महाअधिवेशनापासून तुम्हाला नव्या स्वरुपातील राज ठाकरे पाहायला मिळतील, अशा शब्दांमध्ये संदीप देशपांडे यांनी राज ठाकरेंच्या नव्या राजकीय भूमिकेचे संकेत दिले होते.