शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते – उद्धव ठाकरे

0

मुंबई : शिवसेना जे काही करते ते उघडपणे करते. आम्ही दिवसाढवळया राजकारण करतो. आमच्याकडे रात्रीस खेळ चालेचे राजकारण चालत नाही अशा शब्दात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर टीका केली.भाजपच्या ‘मी’ पणा विरोधात यापुढे लढाई सुरूच राहणार असून केंद्रातील भाजपच्या नेत्यांनी जे केले आहे, त्याचा सूड आम्ही नक्की घेऊ,हा केंद्राने महाराष्ट्रावर केलेला सर्जिकल स्ट्राइक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र राहील आणि आम्ही पुढची दिशा ठरवू असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी अजित पवारांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. या सत्ता स्थापनेनंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत शरद पवारांनी भाजप नेत्यांवर टीका करीत फडणवीस यांना बहुमत सिद्ध करता येणार नाही, असे सांगितले.

उद्धव ठाकरे  म्हणाले की, आधी ईव्हीएमचा खेळ सुरु होता. आता नवीन खेळ चालू आहे. आता निवडणुकीची गरज उरली आहे असे मला वाटत नाही. विश्वासघात झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केले हे सर्वांना ठाऊक आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपाच्या मी पणा विरुद्ध ही लढाई आहे. पाठित खंजीर खुपसण्याचा प्रयत्न करु नका. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राइक करावा तसा हा महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राइक आहे असे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.