शिर्डी :- शिर्डी तिहेरी हत्याकांडाने हादरले आहे. किरकोळ वादातून एकाच कुटुंबातील तिघांची कोयत्याने गळे कापून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज (शनिवारी) सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याशिवाय याच कुटुंबातील दोन जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर संस्थान रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
निमगाव शिवारात मंगेश कातोरे यांच्या वस्तीवर राहणाऱ्या ठाकूर कुटुंबियांची हत्या झाली आहे. ठाकूर यांच्या शेजारी राहणाऱ्या अर्जुन पन्हाळे यांनी किरकोळ वादातून या हत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास अर्जुन पन्हाळे यांनी कोयत्याने ठाकूर दाम्पत्याचे गळे कापले. तसंच शाळेत जाण्याची तयारी करत असलेल्या त्यांच्या १६ वर्षांच्या मुलीचीदेखील कोयत्यानं हत्या केली. पन्हाळे यांच्या हल्ल्यात राजेंद्र ठाकूर (वय ३५ वर्षे) आणि तावू ठाकूर (वय १८वर्षे) जखमी झाले आहेत. त्यांना उपचारांसाठी साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या कुटुंबातील एक सहा वर्षांची मुलगी वाचली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. हत्येनंतर आरोपी शेजारीच असलेल्या त्याच्या खोलीत जाऊन बसला. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून या घटनेमुळे शिर्डी हादरून गेली आहे.