आज शाळा सुरु होण्याचा पहिला दिवस. शैक्षणिक संस्थांच्या तर्फे शाळामध्ये विद्यार्थ्याचे अभिनव पद्धतीने स्वागत करण्यात येते परंतु शाळा सुरु होण्याच्या पहिल्या दिवशी 100 वर्षाची परंपरा असलेल्या जळगाव शहरातील आर.आर. या नामवंत विद्यालयात प्रवेशद्वारावर मुख्याध्यापक आणि शिक्षकांना गावगुंडानी धक्काबुक्की केली. त्यांना शाळेत जाण्यापासून प्रवेशद्वारावरच दांगडो केला. खिन्न
झालेले मुख्याध्यापक सरोदे आणि शिक्षकांनी कसेबसे शाळेत प्रवेश करून आजच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचा स्वागत सोहळा आटोपला. त्यानंतर मुख्याध्यापक सरोदेंसह शिक्षक जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठले. शाळेच्या प्रवेशद्वारावर भाडोत्री गावगुंडांकडून धक्काबुक्की केली अन शाळेत जाण्यास मज्जाव केल्याप्रकरणी फिर्याद दिली तथापि पोलिसांकडून फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. परंतु विद्यालयाचे मुख्याध्यापक सरोदे आणि त्यांचे सहकारी शिक्षक जिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये ठाण मांडून बसले. पोलीस गुन्हा दाखल करून घेण्यासाठी कायद्याचा कीस काढत होते. अखेर मुख्याध्यापक सरोदे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातदोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून घेतला. शाळा सुरु होण्याचा आजचा पहिला दिवस, विद्यार्थ्यांची शाळेत येण्याची लगबग सुरु होती. प्रवेशद्वारावर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना गावगुंडांकडून कडून धक्काबुक्की केली जातेय, त्यांना शाळेत जाण्यापासून मज्जाव केला जातोय हे पाहून कोवळ्या विद्यार्थ्यांच्या मनवर काय परिणाम झाला असेल याची कल्पनाच करवत नाही. संस्था चालक मूग गिळून गप्प बसतात हे कसले दुर्दैव.
आर.आर. हायस्कूलचे संचालक मंडळ आणि शाळेतील मुख्याध्यापक सरोदेंसह 68 शिक्षक यांच्यात गेल्या चार वर्षांपासून संघर्ष चालू आहे. शैक्षणिक संस्थाचालकांच्या आरेरावीविरुद्ध हे सर्व शिक्षक लढा देत आहेत. जिल्हाधिकारी, शिक्षण संचालक, शिक्षणमंत्र्याकडे जाऊन या शिक्षकांनी दाद. मागितली त्यांची दखल या सर्वांनी घेतली शिक्षण संस्थेला तसा जाबही विचारला परंतु शिक्षणसंस्थाचालक लाठी बंधूंची अरेरावी चालूच आहे. शाळेचा पाणीपुरवठा बंद करून त्यांना पाण्यापासून वंचित ठेवतांना विद्यार्थ्यांनासुद्धा पाणी मिळाले नाही. मागच्या ज्या दाराने शिक्षक शाळेत येतात ते दार बंद करण्याचा प्रकारही केला गेला. शिक्षकांना शिवराळ भाषेत बोलून त्यांचा अपमान करणे, त्यांना वेठ बिगारासारखे वागवणे यामुळे सर्व शिक्षक त्रस्त झाले आहेत. मुख्याध्यापक सरोदे यांचे विरोधात निलंबनाची कारवाई करून त्यांना शाळेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तथापी मुख्याध्यापक सरोदे यांचे बाजूने उच्च न्यायालयात निकाल लागला. तारी सुद्धा मुख्याध्यापक सरोदे यांना बेकायदा बडतर्फ केल्याचे सांगून त्यांना शाळेत प्रवेश करण्यास मज्जाव करण्याचे वाचमनला आदेश दिल्याचे सांगतात. शाळेच्या मुख्याध्यापकाला प्रवेशद्वारावर वाचमन मज्जाव करण्यचा हा अजब प्रकार म्हणावा
लागेल. शैक्षणिक संस्थेच्या पवित्र मंदिरात शिक्षकांविरुद्ध संस्थाचालकांचे जे षड्यंत्र चालू आहे ते समर्थनीय नाही.
आर. आर. विद्यालयाच्या संस्थाचालकांनी शाळेतील शिक्षकांच्या संदर्भात आडमुठे पणाचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्राला गालबोट लागतेय . एका मुख्याध्यापक अथवा एखाददोन शिक्षक चुकत असतील तर ते समजू शकतो परंतु शाळेत सर्वच्या सर्व 68 शिक्षक चुकीचे वागतात असे कधीही होत नाही. शिक्षकांप्रती शिक्षणसंस्थाचालकांची भूमिका चुकीची आहे. शिक्षकांना जर वेठ बिगारासारखी
वागणूक संस्थाचालकांकडून मिळत असेल तर ते सर्व शिक्षक एकजूट होऊन त्याला विरोध करीत असतील तर त्यात गैर काय? शिक्षण संस्थाचालकांनी नियमांच्या चौकटीत राहूनच वागले पाहिजे. संस्था चालक आणि शिक्षक यांच्यातील वाद किती विकोपाला गेला ते दहावी परीक्षेच्या भूमिती पेपरमध्ये शिक्षकांकडून सामुहिक कॉपी पुरवण्याचा आरोप केला. यात 100 वर्षाच्या संस्थेच्या परंपरेला गालबोट लागून संस्था बदनाम झाली असा कांगावा करण्यात आला. त्यात विद्यार्थी भरडले जाताहेत याचे भान सुद्धा त्यांना राहिले नाही. शिक्षण संचालकांकडे तक्रार करून त्याची चौकशी करून घेण्याचा फार्सही करण्यात आला चौकशी समितीने या सामुहिक कॉपी प्रकरणाची चौकशी केली असून दहावीच्या परीक्षेचा निकाल लागला तरीसुद्धा अद्याप अहवाल येणे बाकी आहे. सर्व प्रकरणात शिक्षण संचालकांनी हस्तक्षेप करणे आवश्यक आहे.प्रसंगी या संस्थेवर प्रशासक नेमून या संस्थाचालकांच्या तावडीतून शिक्षकांची तसेच विद्यार्थ्यांची सुटका करावी. तरच लाठी बंधूना चपराक बसेल अन्यथा शैक्षणिक संस्थामध्ये वाईट पायंडा पडेल. पवित्र शिक्षण संस्था गावगुंडांचा आखाडा बनू नये हीच अपेक्षा.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.