यावल । येथील मेन रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालकास दि.१३ रोजी रात्री घरी जात असतांना भर रस्त्यात अडवून चाकूहल्ला करत चार लुटले होते. या चोरट्यांपैकी एकाला पकडण्यात नागरिकांना यश आले आहे. तर इतर आरोपींचा देखील शोध घेण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर असे की, येथील मेन रोडवरील समर्थ ज्वेलर्सचे मालक श्रीनिवास नंदकिशोर महालकर हे नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास आपली दुकान बंद करून दुकानातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे एकूण अंदाजे सहा लाख रुपयाचा ऐवज घेऊन घरी जात होते. याच दरम्यान स्वामी समर्थमंदीरच्या परिसरात दबा धरून बसलेल्या चार चोरटयांनी महालकर यांची मोटरसायकल भर रस्त्यात अडवून त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांच्याजवळील सहा लाखाच्या ऐवजाची बॅग घेवुन पोबारा केला. यावेळी चोरट्यांच्या सोबत झालेल्या झटापटीत श्रीनिवास महालकर यांच्या खांद्याच्या बाजुस चाकु लागला आहे. यावेळी आरडाओरड केल्याने परिसरातील युवकांनी धाव घेतली यावेळी नागरीकांच्या मदतीने एका भामटयास पकडण्यात यश आले असुन, त्यास अटक करण्यात आली असुन इतर आरोपींचा देखील शोध घेण्यात येत आहे.