व्यसनाधिनतेमुळे विद्रोही समाजाची निर्मिती – नितीन विसपुते

0

जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त नितीन विसपुते यांचे प्रतिपादन

जळगाव 25-
समाजात चांगल्या पद्धतीने वाढ न झालेली मुले व्यसनाधिनतेकडे वळतात. व्यसनाधिनता व्यक्ती, कुटुंब, समाज बिघडवते. मुलांची वाढ होत नाही किंवा व्यसनाधिनतेमुळे जोडीदार मरण पावतो. त्यामुळे दुसरा मुलांचे संगोपन चांगले करु शकत नाही, अथवा सोडून जातो. यामुळे विद्रोही समाजाची निर्मिती होते. असे प्रतिपादन चेतना व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक नितीन विसपुते यांनी आज येथे केले.
जागतीक अंमली पदार्थ विरोधी दिनेच्या पुर्वसंध्येला त्यांनी लोकशाहीच्या कार्यालयास भेट देवून आपले विचार व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, बालकाचे वडील जर व्यसनी असतील तर त्या घरातील बालक 35% व्यसनाधिनतेकडे वळतात. कारण मुले ही अनुकरणशील असतात. घरातील मोठे ज्याप्रमाणे वागतात त्यांचेच अनुकरण हे लहानगे करीत असतात. बालकाचे आई-वडील दोघे व्यसनी असतील तर त्या घरातील मुले व्यसनी बनण्याचे प्रमाण 400टक्के असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. वर्क होलीक होण्यासाठी लोक व्यसन करतात मात्र, लहान मुलांसमोर तंबाखू, गुटखा, सुपारी खाणे पत्ते खेळणे, सट्टा आदी खेळणे आदी टाळले पाहिजे.
चेतनाच्या माध्यमातून 1 हजार जण व्यसनमुक्त
शहरात चेतना व्यसनमुक्ती केंद्र (एक तप) 12 वर्षापासून प्रयत्नशील आहे. या केंद्राच्या माध्यमातून परिसरातील 1 हजार लोक व्यसनमुक्त झाले असल्याची माहिती त्यांनी दिली. व्यसनमुक्तीसाठी जबरदस्तीने नातेवाईकांकरवी रुग्णाला केंद्रात आणण्याचे प्रमाण हे 90% आहे. तर स्वत:हुन व्यसनमुक्त होण्यासाठी येणार्‍यांचे प्रमाण केवळ 5 ते 7% असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्ण केंद्रात दाखल झाल्यावर व्यसनमुक्त होण्याचे प्रमाण हे 70% आहे. यासाठी व्यसन सुटू शकते असा विश्‍वास रुग्णात निर्माण केला जातो. यासाठी संस्थेत चांगले मानसोपचार तज्ज्ञ, डॉक्टर, पारिचारक, परिचारिका प्रयत्नशील आहेत. दाखल झाल्यानंतर 7 ते 8 दिवसात शरीराची झालेली झिज भरुन काढण्यात येते. प्रत्येक व्यक्तीचे मन हे आरसा असते. त्यावर काम केले जाते. सदर व्यक्तीच्या झालेल्या नुकसानाची त्याला जाणीव करुन देण्यात येते. उदा. खोटे बोलणे, शारिरीक बदल होतात, शब्द आठवत नाहीत, संभाषण व्यवस्थित नसत, मुले बोलत नाहीत आदींची त्यांना जाणीव करुन देवून व्यसनापासून परावृत्त केले जाते.
नवतरुणांनाच धोका
नवतरुणांच्या मित्रमंडळीमुळे व्यसनाचा आस्वाद घेण्याची त्यांची चूक होते आणि त्यातच ते फसतात. तरुण मुले स्टीक फास्ट, फेव्ही क्वीकच्या द्वारे व्यसनं करु लागले आहेत. एका सर्वेक्षणानुसार व्यसनाधिनतेमुळे परिवारात प्रेम न मिळाल्याने तरुण मुलींचे पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. आपल्याकडे निवडणुका, लग्न समारंभ, गटारी अमावस्या आदी जोरदार साजरी करण्याची फॅशन रुढ झाली आहे. तरुणांना मित्रमंडळीतून अंडा नॉनव्हेज नही व बीयर शराब नही असे संस्कार केले जातात. व्यसनींकडून आज गममे है। आज खुशी मे है। असे म्हणत लत भागवली जाते. त्यांना कोणतेही कारण चालते. मी बेवडा आहे पण तेवढा नाही, असे म्हणत फुशारकी मारली जाते. केव्हा आपला कोठा वगैरेबाबत मोठ्या अभिमानाने सांगण्यात येते. व्यसनी लोकांना बेवड्या, फिटाळ, पच्चीस, झिंगाट आदी पदव्या दिल्या जातात.
न्युरॉन्स पेशींची हानी
प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यात 10 हजार न्युरॉन्स पेशी असतात. ह्या पेशी मानवाला त्याच्या मातेकडूनच मिळतात. त्या आईच्या गर्भातच तयार होतात. त्या पुन्हा तयार होत नाही. व्यसनाधिनतेमुळे या पेशींची अपरिमित अशी हानी होते. त्यामुळे शरिरावरचे नियंत्रण सुटते. त्यामुळे शारिरीक दुर्बलता, लैंगिक दुर्बलता येते लैंगिक दुर्बलतेमुळे संशयी वृत्ती बळावते त्यातून घटस्फोट होतात. शरिरातील लिव्हर, आतडे, किडनी, हृदय आदींवर परिणाम होवून व्यक्ती दगावते. समाजात कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. याबाबत श्री. विसपुते यांनी दोन गोष्टींच्या माध्यमातून व्यसनाधिनता विषद केली.
व्यसन- बेडकाच्या सावलीची गोष्ट
एकदा एक बेडूक उन्हापासून वाचण्यासाठी सावली शोधत असतो. त्याला एका ठिकाणी सावली दिसते. तो त्या सावलीकडे जातो. मात्र ती सावली नागाच्या फण्याची असते. तो सावली खाली जातो. तो त्याचा आनंद क्षणिक असतो. कारण बेडूक हे नागाचे भक्ष्य आहे. त्याचप्रमाणे क्षणिक सुखासाठी व्यक्ती आपल्या जीवनातील अनेक आनंदाच्या क्षणांना मुकतो.
व्यसन- म्हणजे माशाचा गळ
एकदा कोळी मासे पकडण्यासाठी गळ टाकतो. तळ्यातील मोठा मासा लहानग्यांना समजावतो. गळाला लागू नका मात्र त्यातील एक तरूण मासा मोठ्या माश्याचे ऐकत नाही. गळाकडे जावून त्यातील भक्ष्य अलगद काढतो. असे दोन तीनदा केल्यानंतर 4 थ्या दिवशी गळाला अडकतो. त्यानंतर कशीबशी त्यातून सुटका करुन घेतो. ज्येष्ठ माश्याचे सांगणे त्याला पटते. त्यानंतर 10 वेळा सुटल्यानंतर 11 व्या वेळी भक्ष पकडण्याचा मोह न आवरल्याने गळात पकडला जातो. पुन्हा केलेल्या चुकीमुळे मृत्यू शिवाय त्याला पर्याय नसतो. तात्पर्य- एकदा व्यसनात अडकल्यानंतर मनुष्याची गत तरुण माश्यासारखीच होते.
11 व्या घरात व्यसनाधिनता
व्यसनाधिनतेबाबत झोपडपट्टीतच व्यसनाधिनता आहे असे म्हणणे चुकीचे असून पॉश उच्चभ्रू लोकांतही व्यसनाधिनता आहे. विविध कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी, व्यसनी आहेत. मेडीकल, सेवा क्षेत्र, शिक्षणसारख्या पवित्र क्षेत्रातही व्यसनाधिनतेचे प्रमाण असल्याची चिंता त्यांनी व्यक्त करत प्रत्येक 11 व्या घरात व्यसनाधिनता आढळून येत असल्याची माहिती त्यांनी दिली.
चेतना व्यसनांना नाही म्हणण्याची
गेल्या 12 वर्षापासून म्हणजे एक वर्षाचे तप करणार्‍या या संस्थेचा अनेकांनी गौरव केलेला आहे. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी स्वत: आवर्जुन चेतना व्यसनमुक्ती केंद्राला भेट देवून संस्थेचे कार्य जाणून घेतले. तेथे दाखल रुग्णांशी संवाद साधून आपला अभिप्रायही त्यांनी नोंदविला आहे. संस्थेच्या या कार्याची दखल घेत पद्मश्री भवरलाल जैन यांनी केंद्राला भेट देवून संस्थेचा गौरव करत आशिर्वाद दिले. अशोक जैन यांनी आपल्या कर्मचार्‍यांना व्यसनाधिनतेतून मुक्त करण्यासाठी संस्थेचे संचालक नितीन विसपुते व त्यांच्या चमूला पाचारण केले होते. तर नितीन विसपुते यांनी लिहिलेल्या ङ्गचेतना व्यसनांना नाही म्हणण्याचीफ हे पुस्तकही त्यांच्या माध्यमातून प्रकाशित केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.