जळगाव : राज्यात विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी 21 मे रोजी मतदान होत आहे. यात भाजपच्या वाट्याला तीन जागा येत आहेत. त्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. दरम्यान, विधानपरिषदेवर तरी आपल्याला संधी मिळावी, अशी इच्छा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी व्यक्त केली आहे.
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी पक्षातर्फे आपल्याला विचारणा झाली होती, त्यावेळी महाराष्ट्र भाजपने आपल्या नावाची राज्यसभेसाठी शिफारसही केली होती. मात्र, राज्यसभेत रस नसल्याचे आपण श्रेष्ठींना स्पष्टपणे कळविले होते. त्यामुळे त्या कालखंडात ते होऊ शकले नाही. आपल्याला राज्याच्या राजकारणात रस असून, विधानपरिषदेवर उमेदवारी देताना आपला विचार करण्यात यावा, अशी आपण पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे. याबाबत योग्य तो निर्णय पक्ष घेईल, याची खात्री आहे, असेही खडसे म्हणाले आहे.

दरम्यान, खडसे यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर विधानपरिषदेसाठी भाजपतर्फे मोठी स्पर्धा लागली आहे. पक्षातर्फे माजी मंत्री पंकजा मुंडे, विनोद तावडे यांच्यासह विजयसिंह मोहिते पाटील, रणजितसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, माधव भंडारी यांच्याही नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. तथापि, खडसे यांनी आता स्वतःच मागणी केल्यामुळे पक्षनेतृत्वाला त्यांचा निश्चित विचार करावा लागणार आहे.

