रुग्णसेवा हाच जीवनाचा ध्यास; आरोग्यदूत अरविंद देशमुख यांचे प्रतिपादन
जळगाव – शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात वडील 45 दिवस आजारपणामुळे दाखल होते. त्यांच्या आजारपणात रुग्णालयातील कामाचा चांगलाच अनुभव आला. ना. गिरीश महाजन यांच्या आदेशाने व प्रफुल्ल लोढा यांच्या मार्गदर्शनात सामान्यांचा अतिशय निकडीच्या असलेल्या आरोग्य सेवेकडे अनुभवाने वळलो व कामास सुरुवात केली, असे प्रतिपादन इंडियन रेडक्रॉस सोसायटीचा आरोग्यदूत पुरस्कार प्राप्त ना. गिरीश महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख यांनी केले. त्यांच्या वाढदिवसांच्या पूर्वसंध्येला लोकलाईव्हच्या लोकसंवाद कार्यक्रमात त्यांनी दिलखुलास संवाद साधला यावेळी ते बोलत होते.

ना. महाजनांच्या विचारांचा पगडा
आपण लहानपणापासूनच ना. गिरीश महाजन यांच्यासोबत आहोत. ग्रा.पं., पं.स., जिल्हा परिषद, मनपा, खासदार आदी निवडणुकीत त्यांच्यासोबत आहे. प्रत्येक निवडणुकीत कार्यकर्त्यांसह मी शिकत गेलो व घडत गेलो. ना. महाजनांच्या विचारांचा जबरदस्त पगडा आपल्यावर आहे. गेली 20 वर्षे ते आमदार आहेत. पहुर येथे उमा भारतींची सभा होती. त्यावेळी ना. महाजन सामान्य कार्यकर्त्यासारखे वावरले.
पत्रकारितेतून समाजसेवा
पत्रकारितेत सुरुवातीला लोकटीव्हीचा प्रतिनिधी होतो. त्यानंतर 15 वर्षे पत्रकारिता केली. पत्रकारितेतही बाबांच्या शिकवणुकीप्रमाणे कायम समाजसेवाच केली. त्या माध्यमातून अनेक मित्र जुळले त्यांची वेळोवेळी मदत व मार्गदर्शनही मिळत असते.
अनुभवातून गंभीर मुलाचे प्राण वाचविले
जामनेर तालुक्यातील एका 11 वर्षाच्या बालकाला साप चावला होता. त्याला गावाच्या पारावर नेण्यात आले. रात्री अडीच वा. त्याला वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. बालकाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली होती. मात्र प्रसंगावधान राखून त्याच्यावर प्राथमिक उपचारांसह वेंटीलेटरवर ठेवण्याचा निर्णय देशमुख यांनी घेतला.योग्यवेळी घेतलेल्या निर्णयामुळे बालकाचे अनमोल प्राण वाचले. याबाबत त्यांचे वैद्यकीय क्षेत्रातूनही कौतुक करण्यात आले.
आरोग्यसेवेत आपलेपणाचा भाव
ना. महाजन यांना कामाचा व्याप असला, ते मुख्यमंत्र्यांसोबतही असले तरी आलेले फोन घेतात. लोकांची धारणा आहे की निव्वळ फोनवर कामे होतात. हा लोकांचा विश्वास आम्ही कमावला आहे. त्याला तडा जाणार नाही याची काळजी घेतो. शिवतीर्थ येथील जी.एम. फाऊंडेशन कार्यालयात 8 ते 10 कार्यकर्ते कायम असतात. तेथे 7 रुग्णवाहिका आहेत. रुग्णांना समर्पित भावनेतून मुंबईपर्यंत नेले जावून तेथे त्यांची व्यवस्था लावली जाते. लोकांना सेवेदरम्यान आपली माणसे सोबत असल्याचा भास असतो.


