भोपाळ: भाजपच्या एका आमदाराने लव्ह जिहादला बळ उशिरा होणाऱ्या विवाहांमुळेच मिळत असल्याचा अजब दावा केला आहे. त्याचबरोबर लव्ह जिहादला आळा बालविवाहांमुळे बसेल, असेही या आमदाराने म्हटले आहे. बालविवाहाची प्रथा पूर्वी होती. वर आणि वधू यांनी एकमेकांना पाहिलेले नसतानाही ज्येष्ठ मंडळींकडून त्यांचे लग्न करुन दिले जायचे. या प्रथेचे आपण समर्थन करत असल्याचे मध्य प्रदेशचे भाजप आमदार गोपाल परमार यांनी म्हटले आहे.
मुलींचे वय १८ वर्षे होण्याआधीच पूर्वी त्यांचे लग्न करुन दिले जायचे. २१ वर्षे पूर्ण होण्याआधीच मुलांचा विवाहदेखील केला जायचा. पूर्वी कमी वयातच मुलामुलांची लग्न ठरवली जायची. लवकर लग्न ठरवल्यामुळे मुले चुकीच्या मार्गावर जाण्याचे प्रमाण कमी होते. दुसऱ्या एखाद्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याआधीच मुलांचे लग्न ठरवले जायचे. मात्र आता मुले कोचिंग क्लासला जातात. ते लव्ह जिहादसारख्या सापळ्यांमध्ये अडकतात, असे गोपाल परमार यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटले आहे. परमार मध्यप्रदेशमधील अगर विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.