लग्नसमारंभासाठी पन्नास व्यक्तींना परवानगी विना वातानुकुलित मंगल कार्यालयांनाही परवानगी

0

अमरावती (प्रतिनिधी) : कोरोना प्रतिबंधक उपाय योजनेनुसार लग्नसमारंभाला घालण्यात आलेली 25 लोकांची मर्यादा वाढवून 50वर करण्यात आली आहे. त्यामुळे  वर-वधू ,नातेवाईक, भटजी, आचारी, वाजंत्री सर्व मिळून 50 व्यक्तीना लग्नसमारंभासाठी उपस्थित राहता येईल. त्याशिवाय नाॅन एसी मंगल कार्यालय सभागृहामध्ये सुध्दा लग्न समारंभ आयोजित करण्यासही परवानगी देण्यात आली आहे .

जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी तसा आदेश 26 मार्च रोजी दिला आहे. त्यानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत लग्न समारंभ आयोजित करता येईल. लग्न समारंभ वर किंवा वधूचे घरी त्याचप्रमाणे खुले लॉन, मंगल कार्यालय ,सभागृहात करता येईल मात्र एका ठिकाणी एका दिवशी एकच लग्नसमारंभ होईल व केवळ 50 व्यक्ती उपस्थित राहतील. वाजंत्री पथकाला केवळ लग्न स्थळिच वाद्य वाजविण्याची मुभा आहे. त्याच प्रमाणे त्यांना कोविड चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. लग्न समारंभाच्या ठिकाणी सुरक्षित अंतर मास्क, सॅनिटायजरचा वापर व सर्व नियमांचे पालन होणे बंधनकारक आहे.

कुठेही नियमभंग आढळल्यास आयोजकांना 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे .त्याचप्रमाणे वधू-वर व आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. लग्न समारंभ आयोजित करण्यापूर्वी आयोजकांनी अपेक्षित व्यक्तींच्या यादी सादर करुन लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी प्राधिकारी म्हणून अमरावती शहरासाठी महापालिका आयुक्तांना, नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकारी व ग्रामीण भागासाठी तहसीलदारांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे. संबंधितांनी परवानगी देताना सर्व लोकांची कोविड तपासणी झाल्याची खात्री करूनच परवानगी द्यावी. असे स्पष्ट निर्देश जिल्हा दंडाधिकारी श्री शैलेश नवाल यांनी दिले आहेत .

Leave A Reply

Your email address will not be published.