जळगाव, दि 6 –
शहरातील रेल्वेस्थानकाच्या बाहेर वारंवार होणारा पार्कींगचा त्रास टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पार्कींग पोल लावले. त्यामुळे रेल्वेस्थानकाच्या बाहेर उभ्या राहणार्या वाहनांची कोंडी सुटली. परंतु, त्या पोलमुळे इतर वाहनधारक रस्त्यावर वाहने उभी करतात. त्यामुळे रेल्वेस्थानकावर ये-जा करणार्या नागरिकांना कसरत करावी लागते.
रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण करताना स्थानकाच्या समोरील बाजूला जमिनीवर पेव्हर ब्लॉक बसविण्यात आले. पेव्हर ब्लॉक बसविल्यानंतर नागरिकांनी त्यावरच दुचाकी उभ्या करण्यास सुरूवात केली.
कर्मचार्यांची केली होती नेमणूक
पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेल्या जागेवर स्थानकावर येणारे वाहनचालक बेशिस्तपणे वाहने लावत होते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. गैरसोय टाळण्यासाठी आणि रेल्वेस्टेशन परिसर मोकळा दिसावा म्हणून काही महिने रेल्वे पोलिसांची नेमणूक करण्यात आली होती. सकाळपासून सायंकाळपर्यंत विशेषतः गर्दीच्या वेळी पोलीस वाहने लावणार्यांना हटकत होते. बर्याच वेळा तर वाहनातील हवा देखील सोडण्यात येत होती. त्यामुळे वाहनचालकांना शिस्त लागली होती.
उद्देश साध्य मात्र..
रेल्वेस्थानकाला लागूनच उभ्या केल्या जाणार्या वाहनचालकांना रोखण्यासाठी रेल्वेप्रशासनाकडून त्याठिकाणी लोखंडी खांब बसविण्यात आले. स्थानकाचा मुख्य प्रवेश असलेल्या रस्त्याकडूनच एक ते दीड फुटांच्या अंतराने खांब बसविण्यात आले आहे. नो पार्कींगसाठी योजलेला रेल्वे प्रशासनाचा फंडा यशस्वी झाला असेल मात्र नागरिकांची गैरसोय होण्यास सुरूवात झाली आहे.


