ठाणे: – राष्ट्रीय स्वयंसेवकांची मानहानी केल्याप्रकरणी भिवंडी न्यायालयात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधीविरोधात आरोप निश्चित करण्यात आले आहेत. मात्र राहुल गांधी यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. राहुल गांधी यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीतील एका जाहीर सभेत आरएसएसने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या घडवून आणली, असे वादग्रस्त विधान केले होते. याविरोधात रा. स्व. संघाचे स्थानिक कार्यवाह राजेश कुंटे यांनी मानहानीचा दावा दाखल केला. याबाबत भिवंडी न्यायालयात सुनावणी सुरू आहे. राहुल गांधी स्वतः सुनावणीसाठी उपस्थित राहिले आहेत.
मागील सुनावणीच्या वेळी राहुल गांधी गैरहजर असताना त्यांचे वकील अॅड. नारायण अय्यर यांनी महात्मा गांधी यांची हत्या ही ऐतिहासिक केस असल्याने सबळ पुरावा, वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी समन्स ट्रायल प्रक्रियेद्वारे ही याचिका चालवावी, अशी मागणी केली आहे. याबाबत, आज कोर्टाकडून निर्णय अपेक्षित आहे. सुनावणी भिवंडी दिवाणी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ए.ए. शेख यांच्या कोर्टात होणार आहे. भिवंडीत सुनावणी झाल्यानंतर राहुल गांधी मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.