मुंबई : राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान, उध्दव ठाकरे हेच महाराष्ट्रातील पुढचे मुख्यमंत्री असतील, अशी घोषणा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली होती. पण एका रात्रीत अशी काय गोष्ट घडली की, भाजपा आणि राष्ट्रवादी पक्ष एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन झालं. या सगळ्याची चर्चा सुरू आहे. नेमकं असं काय झालं की, महाआघाडीची चर्चा सोडून अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
NCP's Ajit Pawar takes oath as Deputy CM,oath was administered by Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhawan pic.twitter.com/e1wVtiGZJX
— ANI (@ANI) November 23, 2019
शपथविधीच्या कार्यक्रमात अजित पवारांसोबत राष्ट्रवादीकडून पार्थ पवार ही एकच व्यक्ती उपस्थित होता. त्यामुळे राष्ट्रवादीत गट फुटला की काय? अशी देखील आता चर्चा आहे. अजित पवारांनी भाजपाला सपोर्ट करत एका रात्रीत महाराष्ट्रातील ‘राष्टपती राजवट’ हटवून स्थिर सरकार स्थापन केलं आहे. अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर दिलेल्या मुलाखतीत, ‘स्थिर सरकारकरता मी हा निर्णय घेतला. बरेच दिवस शिवसेनेसंदर्भात शरद पवारांची चर्चा सुरू असूनही ठाम निर्णय होत नव्हता. या चर्चांना कंटाळून आम्ही हा निर्णय घेतला आहे, असे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत राष्ट्रवादीचा गट फुटला? असं या परिस्थितीतून वाटत आहे. या सगळ्या प्रकरणावर आता शरद पवारांची भूमिका पाहणं महत्वाची राहणार आहे.