मुंबई : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह अनेक मोठ्या शहरात कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढतोय. राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.
राज्यात काल (25 मार्च) 35 हजार 952 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. काल नवीन 20 हजार 444 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. तर दिवसभरात 111 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या एकूण 2 लाख 62 हजार 685 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 87.78% झाले आहे. आतापर्यंत एकूण 22 लाख 83 हजार 037 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 13 लाख 62 हजार 899 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर 13 हजार 770 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईतील कोरोना स्थिती –
मुंबईत काल दिवसभरात 5 हजार 504 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 2 हजार 281 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईत काल 14 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 7 रुग्णांना काही दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 10 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे. मुंबईतील बरे होणाऱ्या रुग्णांचा दर 88 टक्के आहे. तर मुंबईतील रुग्ण दुपटीचा दर 75 दिवसांपर्यंत खाली आला आहे.