मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
हवामान विभागाने मुंबईसह काही जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह राज्यातील काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज असू, ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईसह काही जिल्ह्यांना यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
३० ऑगस्ट,कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असून,१५° उत्तर वर पूर्व-पश्र्चिम शियर जोन आहे. ह्यांचा प्रभाव म्हणून,महाराष्ट्र राज्यासाठी IMD ने खालील प्रमाणे इशारे पुढच्या ३,४दिवसासाठी दिलेले आहेत.काही ठिकाणी मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता.मुंबई ठाणे,उत्तर कोकणात पण @RMC_Mumbai pic.twitter.com/e8tHRpwd6K
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 30, 2021
तसेच मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने राज्याच्या विविध भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार छत्तीसगडवर कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्याचबरोबर पूर्व-पश्चिमेकडून वारे वाहत असल्याचा परिणाम जाणवणार आहे.
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांत पुढील तीन दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आजपासून ते १ सप्टेंबरपर्यंत उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांना ऑरेंज तसेच यलो अलर्ट दिला आहे.
उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि रायगडला उद्या ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर लातूर आणि उस्मानाबाद आणि नाशिकलाही ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले जिल्हे
लातूर, उस्मानाबाद (३० ऑगस्टसाठी), नाशिक, ठाणे, रायगड (३१ ऑगस्ट), पालघर (१ सप्टेंबर).
यलो अलर्ट देण्यात आलेले जिल्हे
३० ऑगस्ट – जळगाव, औरंगाबाद, बीड सोलापूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया, गढचिरोली, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग.
३१ ऑगस्ट रोजी यलो अलर्ट देण्यात आलेले जिल्हे
पुणे, रत्नागिरी, पालघर, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती.
१ सप्टेंबरसाठी यलो अलर्ट देण्यात आलेले जिल्हे
नंदुरबार, नाशिक, ठाणे, रायगड, अकोला.
हवामान विभागाने पालघर, ठाणे, रायगड, पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी, बीड या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मुंबईत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे, तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुरमध्ये मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.