पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क
राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सर्वत्र ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस कोसळला आहे. अवेळी पडणाऱ्या या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होतं आहे.
हवामान खात्याने पुण्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान खात्याने पुण्यासह, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ जारी केला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि सध्या दक्षिण अंदमान समुद्रात निर्माण होत असलेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार होत आहे. त्यामुळे 30 डिसेंबरपासून पुढील तीन दिवसांमध्ये राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.