मुंबई: राज्यात मोठा सर्वात पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता सोडण्याची नामुष्की आली. देवेंद्र फडणवीस यांनी काल मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे भाजपाच्या हातून आणखीन एक राज्य निसटले आहे. महाराष्ट्रातील सत्ता गेल्याने देशभरातील एकूण भूप्रदेशापैकी केवळ ४० टक्के भूभागावर भाजपाची सत्ता उरली आहे. २०१८ साली भाजपाची सत्ता ७१ टक्के भूभागावर होती. त्यामुळे मोदी आणि शहा यांचा करिश्मा कमी झाला का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
२०१४ साली भाजपा केंद्रामध्ये सत्तेत आल्यानंतर त्यांची विजयी घौडदौड सुरु झाली होती. २०१४ साली केवळ सात राज्यांमध्ये सत्ता असणाऱ्या भाजपाने २०१८ च्या शेवटपर्यंत देशातील २२ राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. मोदी लाट आणि अमित शाह यांच्या चाणक्यनितीच्या जोरावर भाजपाने हे यश मिळवले. मात्र २०१८ च्या मध्यनंतर ही विजयी घौडदौड मंदावली. २०१४ साली भाजपा गुजरात, मध्यप्रेधेस, राजस्थान, छत्तीसगड, गोवा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये थेट किंवा सहकारी पक्षांच्या सोबतीने सत्तेत होते. २०१८ साली सप्टेंबर महिन्यात केवळ मोजकी राज्ये वगळल्यास देशभरात भाजपाचीच सत्ता होती. तामिळनाडू (एआयएडीएमके), केरळ (एलडीएफ), कर्नाटक (काँग्रेस), मिझोरम (काँग्रेस), पंजाब (काँग्रेस), ओदिशा (बीजेडी), पश्चिम बंगाल (तृणमूल काँग्रेस) आणि तेलंगण (टीआरएस) या आठ राज्यांमध्ये भाजपा सरकार नव्हते.
दोन वर्षात अनेक राज्य गमावणाऱ्या भाजपाला महाराष्ट्रातही धक्का बसला. राज्यात मोठा सर्वात पक्ष ठरूनही भाजपाला सत्ता सोडण्याची नामुष्की आली. देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीतून बंडखोरी केलेल्या अजित पवारांना सोबत घेऊन सरकार स्थापन केलं. मात्र, अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनीही मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन करणार असून आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली.