नवी दिल्ली : लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक देशातील 13 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 117 मतदारसंघात मतदान पार पडले. या दरम्यान अहमदाबादमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केल्यानंतर ”रोड शो” केल्याप्रकरणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच त्यावेळी माध्यमांशी बोलताना राजकीय वक्तव्य केल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे. त्यावरून पंतप्रधानांवर दोन ते तीन दिवसांची प्रचारबंदी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरातमधील मुख्य निवडणूक अधिकाऱ्याकडून (सीईओ) अहवाल मागितला आहे.
याखेरीज भाजप अध्यक्ष अमित शहा यांनीही आचारसंहितेचा भंग केल्यावरून त्यांच्यावर ७२ तासांची प्रचारबंदी करावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे भूमिका मांडली. अहमदाबादमध्ये मतदान केल्यानंतर पंतप्रधानांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंतप्रधानांचे पद मोठे आहे, अशा वेळी मोदी वारंवार आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करत असल्याचे आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्याचे अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले. दरम्यान या संदर्भात पत्रकारांशी बोलताना पंतप्रधानांच्या रोड शोबाबतचा अहलवाल मागवला असल्याची माहिती वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा यांनी दिली. प्रथमदर्शनी पंतप्रधानांनी निवडणूक आचार संहितेचे उल्लंघन केले नसल्याचे गुजरातमधील निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, या बाबत आयोगाने कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.