नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज नाशिकच्या पिंपळगावमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा झाली. यावेळी मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. ‘पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पार पडलंय आणि विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मी घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर बोललो की काही लोकांना कंरट लागतो आणि मला शिव्या द्यायला सुरुवात करतात, अशी कोपरखळी त्यांनी पवारांचे नाव न घेता मारली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवलसह आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी मोदींनी श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांच्या घटनेचा उल्लेख करत भारतातील दहशतवादी हल्ल्यांच्या घटनांवरून तत्कालीन यूपीए सरकारला लक्ष्य केलं. याआधी भारतातही अशा प्रकारचे स्फोट होत होते. पण आता भारताकडे नजर वर करून पाहण्याआधी शंभर वेळा विचार करावा लागतो. ‘२०१४पूर्वी देशात काय परिस्थिती होती? देशातील विविध भागांत बॉम्बस्फोट होत होते. तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार केवळ शोकसभा घेत होते आणि जगभरात पाकिस्तानच्या नावानं गळा काढत होते. आता भारताकडे नजर वर करून पाहण्याआधी शंभरवेळा विचार करतात. दहशतवाद्यांना आता कळलंय की भारतात बॉम्बस्फोट घडवले तर हा मोदी आहे, दहशतवादी आणि त्यांच्या म्होरक्यांना पाताळातूनही शोधून काढून ठार मारेल,’ असंही ते म्हणाले.
‘आम्ही नजर खाली किंवा वर करून पाहणार नाही, तर नजरेला नजर भिडवून बोलू, असं तेव्हा सांगितलं होतं. आज प्रत्येक भारतीय नागरिक ताठ मानेनं उभा आहे. जगभरात भारत आणि देशवासियांचा जो जयजयकार सुरू आहे, तो तुमच्या एका मतामुळं होत आहे. भारत सध्याच्या आव्हानांना सामोरे जात आहे ही तुमच्या त्या मताची ताकद आहे,’ अशा शब्दांत त्यांनी मतदारांच्या भावनांना हात घातला. देशाची सुरक्षा, सन्मान आणि स्वाभिमानाची ‘चौकीदारी’ तुमच्या हातात आहे. निवडणुकीत कमळाच्या चिन्हासमोरील बटन दाबून चौकीदाराला आणखी बळकट करायचं आहे, असं आवाहनही त्यांनी केलं. मोदी सरकार पुन्हा सत्तेत आलं तर महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.