मुंबई: राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
सत्तास्थापनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू.”असा विश्वास त्यांनी दिला आहे.